Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीपालघर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप

पालघर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप

पालघर (प्रतिनिधी) : बुधवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला. दिवसभर लोकांना सूर्याचे दर्शन होऊ शकले नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. या पावसाने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे आजारपण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पाऊस दोन दिवस राहील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असून वातावरणसुद्धा ढगाळ राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या आठ महिन्यांत अधूनमधून पावसाचे आगमन सुरूच आहे. दिवाळीच्या दरम्यानही पावसाने हजेरी लावली होती. तथापि, तोपर्यंत शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही; परंतु त्यापूर्वी झालेली अतिवृष्टी व दिवाळीपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची उर्वरित कामे जलदगतीने पार पाडली.

वाड्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

वाडा तालुक्यात बुधवार (दि. १ डिसेंबर) सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खळ्यावर रचून ठेवलेल्या भाताच्या भाऱ्यांत पाणी गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. शिवाय, गुरांसाठी असणारा पेंढा पाण्यात भिजल्याने तोही खाण्यालायक राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी पूर्वजांपासून सांभाळून ठेवलेले भातशेतीचे क्षेत्र कमी केलेले नाही. खते, बियाणे, मजुरी, अवजारे या खर्चात प्रचंड दरवाढ झालेली असतानाही येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भातशेती आजवर त्याच जोमाने केली आहे. खरीप हंगामात भात हे एकमेव पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भातपिकाला गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे, या पावसामुळे रब्बी पिकेही कुजून जाणार आहेत. येथील शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाशी सामना करत असताना तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड देत असताना पीक विमा कंपन्यांकडून येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न देता तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

विमा कंपन्यांची नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ

खरीप हंगामात भातशेती करण्यासाठी दर वर्षी येथील अनेक शेतकरी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून पीककर्ज घेत असतो. हे पीककर्ज देताना सहकारी संस्था या शेतकऱ्यांकडून भातपिकांचा विमा काढतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीत या विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत असतात, असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

वसई-विरारमध्ये पावसाच्या सरी

हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टप्रमाणे वसईत बुधवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना हैराण केले आहे.

भारतीय हवामान पालघरला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पालघर, बोईसर, डहाणू, वसई भागात पावसाची संततधार सुरू झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत १ डिसेंबरला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने वसई-विरारमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वसई-विरारच्या काही भागांत हलका पाऊस पडला. नालासोपारा पूर्व, विरार पूर्व याठिकाणी असलेल्या सकल भागात पाणी साचले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरीपण मंगळवारी पावसाचा अंदाज असूनही पाऊस न पडल्याने दिसल्याने नागरिकांनी कोणतीही तयारी न ठेवल्याने बुधवारी अचानक सकाळी पाऊस सुरू झाला आणि रोजच्या कामात नागरिकांना त्रास झाला. याचबरोबर या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनाही याचा मोठा त्रास झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

डहाणूत अवकाळी पावसामुळे शेतकरी-मच्छीमारांचे नुकसान

डहाणू तालुक्यात बुधवार सकाळपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेले दोन-तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मुंबई हवामान विभागाने पाऊस कोसळण्याची व्यक्त केलेली भीती अखेर खरी ठरवत बुधवार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे भातझोडणी, पावळी, गवत भिजून गेले आहे. तसेच, बागायतदारांनी लागवड केलेला भाजीपाला, ऐन फुलावर आलेली मिरची, ढोबळी मिरचीची फुले गळून गेल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. या पावसामुळे बागायतदारांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

याशिवाय, या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान मच्छीमारांचे झाले आहे. सध्या बोंबील मासेमारीचा हंगाम सुरू असून धाकटी डहाणू येथे उन्हात सुकत टाकलेले बोंबील, करंदी, मांदेली, सुकट असे मासे पाऊस पडल्यामुळे जमिनीत पुरून टाकण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. शिवाय, हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह वादळीवाऱ्याबरोबरच पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना पुन्हा माघारी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मासेमारी पूर्णपणे बंद राहिली असल्याने त्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -