काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर मोदींचा हल्लाबोल!
प्रणव मुखर्जी, शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी दिली नाही
एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे काँग्रेसने खच्चीकरण केल्याचे सांगत मोदी यांनी एनडीए (NDA) खासदारांच्या बैठकीत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी रात्री एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अनेक अहंकारी उदाहरणांचा दाखला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. आपल्याला एनडीए म्हणून काम करायचे आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या विकासासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. यावेळी पीएम मोदींनी राजस्थानच्या खासदारांना संबोधित करताना सांगितले की, राजस्थानमधील कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही. भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानची निवडणूक जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.