मुंबई : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे (Raising prices) सर्वसामान्य माणसाचा तणाव वाढला आहे. महागाईने (Inflation) सामान्य माणसाचे हाल केले आहेत. त्यातच भाज्यांचे दरही वाढल्यामुळे तो पिचला आहे. अशातच बटाटा (Potato), कांदा (Onion), टोमॅटो (Tomato) अशा प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अलिकडच्या आठवड्यात दररोजच्या जेवणात समावेश असणाऱ्या प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत, याचाच परिणाम अन्नधान्याच्या महागाई दरावर दिसून येतो. ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार, बटाट्याचा किरकोळ दर वार्षिक आधारावर ३३ टक्क्यांनी वाढला आहे आणि सध्या तो २० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर कांद्याच्या किरकोळ भावात २० टक्के वाढ होऊन तो ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. टोमॅटोच्या दरांत वार्षिक ५० टक्के वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात टोमॅटो ३० रुपये किलोनं विकला जात आहे. पुढील काही महिन्यांत टोमॅटो आणि बटाटा यांसारख्या भाज्यांच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
कांद्याच्या वाढत्या किमतींवर रोख लागणार?
किरकोळ बाजारात कांदा सध्या ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या तीन महिन्यांत त्याच्या किरकोळ किमतींत २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये कांद्याच्या किमतींत ७४ टक्क्यांची वाढ झाली होती, त्यानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यासोबतच सरकारने २५ रुपये दराने कांदा विकण्याचा निर्णयही घेतला होता.
केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे नाशिकच्या बाजारातून कांद्याचा भाव आता एक हजार रुपये प्रति क्विंटलवर आला आहे, जो महिन्याच्या सुरुवातीला २ हजार रुपये प्रति क्विंटल होता. टोमॅटो, बटाटा आणि कांद्याचा महागाई दरात ०.६ टक्के, १ टक्के आणि ०.६ टक्के वाटा आहे. अशा परिस्थितीत या भाज्यांचे दर वाढले तर त्याचा परिणाम अन्नधान्य महागाईवर नक्कीच दिसून येईल.