मविआच्या नाना पटोलंचंच संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election Constistuency) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Seat Sharing) बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांचं मत विचारात न घेता ठाकरे गटाने थेट या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सध्या वाद प्रतिवाद सुरु आहेत. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका वक्तव्याला काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत नौटंकी थांबवा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका’, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले म्हणाले, “संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू. मात्र, त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये”, असा सल्ला पटोलेंनी राऊतांना दिला आहे.
पुढे ते म्हणाले, “लोकशाही विरोधातील भाजपचं सरकार हे कशाही प्रकारे सत्येत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, असं असतानाही लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करावं हे न पटण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी त्यामध्ये सुधार करावा. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य मोठ्या नेत्याने करु नये”, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, असं संजय राऊत यांनी सांगलीतील सभेत भाजप उमेदवार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे (Congress) नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सांगलीच्या जागेवरुन वसुली करण्याचा ठाकरे गटाचा डाव : नितेश राणे
दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीची जागा काँग्रेसला देण्यासाठी ठाकरे गटाने १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे, असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊत सांगलीला ही वसुली करण्यासाठीच गेले होते असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे.