प्रशांत जोशी
डोंबिवली : कोरोना काळात सर्वात जास्त आर्थिक घोटाळा करण्यात मुंबई महानगरपालिकेचा वरचा नंबर आहे. या काळात भारतात सर्वात जास्त कोरोना मृत्यूची संख्या आहे. मात्र, हे ठाकरे सरकारने जनतेपासून लपवले आहे. याला हे सरकार जबाबदार असून या घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. यावर मंगळवारी मुंबई महानगरपालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे. यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर आहे, असा स्पष्ट इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डोंबिवलीत दिला.
सोमय्या रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील ठाकूर सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सोमय्या यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधला.
कोरोना काळात मोदी सरकार महाराष्ट्राला मोफत लस देणार होते, मात्र मुंबई महापालिकेच्या महापौरांनी आम्हाला तुमची लस नको, आम्ही तीन महिन्यांत मुंबईतील सर्व जनतेला लस देऊ असे बोलल्या होत्या. अजूनही मुंबईतील ती लस जनतेपर्यंत पोहोचलीच नाही.
यावेळी किरीट सोमय्या यांचे ‘महावसुली सरकारचे हे घोटाळे’ हे पुस्तक कार्यकर्त्यांना देण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक मंदार हळबे यांसह महिला पदाधिकारी सुहासिनी राणे, पूनम पाटील आदी उपस्थित होते.