बंगळूरु (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश विरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहीला. त्यामुळे सर्वाधिक वेळा विजेतेपद उंचावलेल्या मुंबईने यंदा पुन्हा एकदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यशस्वी जयस्वाल, हार्दिक तमोरे आणि अरमान जाफर यांची शतके मुंबईच्या यशासाठी मोलाची ठरली. यशस्वी जयस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
उत्तर प्रदेशविरुद्धचा उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल लागला नाही. परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला पुढे चाल देण्यात आली. मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्यासमोर आता मध्यप्रदेशचे आव्हान आहे. अंतिम फेरीचा हा सामना बुधवारी बंगळूरुमध्येच होणार आहे.
मुंबईच्या विजयात युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने चमक दाखवली. यशस्वीने दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी खेळली. पहिल्या डावात त्याने १०० धावा केल्या, तर दुसऱ्या डावात यशस्वीने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्यामुळे विजय मुंबईच्या आवाक्यात आला. त्याला हार्दिक तामोरे आणि अरमान जाफर यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने चौथ्या दिवसाअखेर भक्कम अशी आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाअखेर मुंबईकडे ६६२ धावांची आघाडी होती. त्यामुळे मुंबईचा विजय जवळपास निश्चितच मानला जात होता.
यशस्वी जयस्वाल (१८१ धावा) आणि अरमान जाफर (१२७ धावा) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील दुसऱ्या डावात ६६२ धावांची डोंगराएवढी आघाडी घेतली होती.
अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक वेळा विजेतेपद उंचावलेल्या मुंबईने यंदा आपला धमाका कायम ठेवला आहे. उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि अरमान जाफर या जोडीने कमालीची फलंदाजी केली. जयस्वालने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली. त्याला अरमान जाफरने चांगली साथ दिली. जाफरने १२७ धावांची खेळी खेळली. मुंबईने चौथ्या दिवसाअखेर ४ फलंदाजांच्या बदल्यात ४४९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईने ६६२ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशचा प्रिंस यादव बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने दोन बळी मिळवले. शिवम मावी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
दरम्यान मुंबईने उत्तर प्रदेशला पहिल्या डावात १८० धावांवर सर्वबाद केले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, तनुष कोटीयन या मुंबईच्या त्रिकुटाने उत्तर प्रदेशच्या फलंदाजीचा कणाच मोडला. या तिघांनीही प्रत्येकी ३ फलंदाज बाद करत उत्तर प्रदेशला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. धवल कुलकर्णीने एक बळी मिळवला. त्यामुळे उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला होता.