पंतप्रधान मोदी यांचे विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘परीक्षा पे चर्चा’मधून अगदी यथायोग्य मार्गदर्शन होत असते, असा त्या कार्यक्रमाचा लौकिक पसरला आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाची टिंगल विरोधकांकडून करण्यात आली. पण, आज लाखो विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे, हे लक्षात आल्यावर टवाळीचा सूर कमी झाला आहे. मोदी यांचे विचार आणि त्यांचे बोलणे विद्यार्थ्यांना आवडतात, हे त्यांच्या या कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीवरून आणि आभासी माध्यमातून ऐकणाऱ्यांच्या संख्येवरून स्पष्ट होतेच.
शुक्रवारचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम अडतीस लाख विद्यार्थ्यांनी ऐकला, असे सांगण्यात येते. त्याच्या लोकप्रियतेचा यावरून अंदाज यावा. पण हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या कसोटीवरच महत्त्वाचा आहे, असे नाही. त्यातून मोदी जे विचार विद्यार्थ्यांना देतात, ते जास्त महत्त्वाचे असतात. परीक्षेत नक्कल करणाऱ्यांबद्दल आणि मोबाइल वगैरे गॅजेटच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला मोदींनी जो उपदेश केला, तो घरातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने केल्यासारखा होता. अर्थात विद्यार्थ्यांवर त्याचा कितपत परिणाम झाला, हे सांगता येत नसले तरीही त्या उपदेशाची महती तर कमी होत नाही. विद्यार्थ्यांकडून आज-काल गॅजेट्सचा अत्याधिक वापर होत आहे. त्याबद्दल मोदींनी चिंता व्यक्त केली. अर्थात हे विचार आजच्या सर्वच मध्यमवयीन पालकांचे आहेत. त्यांना आपला मुलगा किंवा मुलगी या मोबाइलच्या आहारी गेलेली उघडपणे दिसते. पण हल्ली पालकांची सत्ता घरात राहिलेली दिसत नाही. पालकांची सत्ता राहिली नसल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक ते मनमोकळे वातावरण मिळाले आहे, ही चांगली गोष्ट असली तरीही विद्यार्थ्यांना कोणते गॅजेट किती वेळ वापरावे याचे स्वतःचे ज्ञान नसल्याने ते आहारी जातात. त्यावरच मोदी यांनी जी चिंता व्यक्त केली आहे, ती रास्तच आहे. खुद्द पालकही मोबाइलच्या आहारी गेले आहेतच. हल्ली कित्येक मुले-मुली कायम मोबाइलमध्ये तोंड घालून बसलेली दिसतात, हे सार्वत्रिक दृष्य आहे. सर्वच ते पाहतात, पण कुणी काहीच करू शकत नाही. मोदींनी अनेक मौलिक विचार दिले आहेत. त्यापैकी एक होता की, विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवावा, मोबाइलवर नाही. मोबाइलचा शिक्षणासाठी वापर हा क्रांतिकारक मानला गेला आणि कोरोना महासाथीच्या काळात तेच एक माध्यम विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे राहिले होते, हे खरे असले तरीही त्याची दुसरी बाजूही समोर आलीच आहे. विद्यार्थ्यांना मोबाइलच्या अतिवापरामुळे कित्येक वाईट सवयी लागल्या आहेत आणि कौटुंबिक संवाद संपला आहे. मोदी यांनीच म्हटल्याप्रमाणे एकाच खोलीतून आई-वडील, मुले एकमेकांना व्हॉट्सअॅपवर संदेश टाकत असतात. हे अगदी वास्तव आहे. पण ही स्थिती बदलण्यासाठी मोदींनी तंत्रज्ञानविषयक उपास पाळण्याचा सल्ला दिला आहे. मोबाइलचे वेड इतके पराकोटीला गेले आहे की, मोबाइल दिला नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना आता बंद झाल्या आहेत. कारण मुलाला किंवा मुलीला मोबाइल घेऊन न देण्याचे धाडस आज पालकांकडे नाही. शाळा-महाविद्यालयांत मोबाइल वापरू द्यावा का? हा एक ज्वलंत चर्चेचा विषय आहे. पण त्यावर बोलण्याचे धैर्य राजकीय नेते दाखवत नाहीत. कारण हे विद्यार्थी हेच उद्याचे त्यांचे मतदार आहेत. दिवसाचा काही वेळ तंत्रज्ञानविषयक उपास पाळण्याची कल्पना ही चांगलीच आहे. कारण त्या वेळात कुटुंबाचे सदस्य एकमेकांच्या जवळ येतील. पण त्याहीपेक्षा मोदी यांचा नक्कलबहाद्दरांना दिलेला सल्ला जास्त मोलाचा आणि सर्वच विद्यार्थ्यांचे डोळे उघडणारा आहे. जीवनात कधीही शॉर्टकट घेऊ नका, प्रत्येक टप्प्यावर परीक्षा असते. नक्कल किती परीक्षेत करत राहणार, हा त्यांचा सवाल अत्यंत यथार्थ होता. पण काही मुलांना तरी नक्कलबहाद्दरांमुळे आपले शैक्षणिक नुकसान होत आहे, याची जाणीव झाली, हे जास्त आशादायक आहे. ही जाणीव वाढती राहिली, तर परीक्षा हॉलमधील इतर मुलेच नक्कलबहाद्दरांना पकडून देतील. पूर्वी मला काय त्याचे, ही प्रवृत्ती होती. आता तसे होणार नाही. याचीही एक दुसरी बाजू आहे. काही शाळांतील शिक्षकच विद्यार्थ्यांना नक्कल करण्यासाठी मदत तर करतात, पण त्यांना नकलाही पुरवतात. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अशा कामांसाठी काही परीक्षा केंद्रे कुख्यात आहेत. त्यांना आळा घालण्याचे काम शिक्षण खात्याचे आहे. विद्यार्थ्यांनी नक्कल करू नयेच, पण त्याचबरोबर परीक्षेत निकाल चांगला लावून आपली नोकरी टिकावी म्हणून जे शिक्षकच मुलांना कॉपीसाठी मदत करतात, त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे. मोदी यांनी त्या मुद्द्याला स्पर्श केला नाही.
मोदी यांनी आपल्या या दोन तासांच्या संवाद कार्यक्रमात विविध अंगांना स्पर्श करणारे प्रश्न घेतले होते आणि त्यांना त्यांनी उत्तरेही अगदी समर्पक अशी दिली. मुलांना घरात कोंडून ठेवू नका, हा त्यांचा सल्ला मात्र सर्व पालकांना एक अंजन होते. कारण पालक मुलांना घराबाहेर सोडतच नाहीत. त्यांना घराच्या मर्यादित आकाशात कोंडून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या कक्षा रुंदावतच नाहीत. मुलांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, असा मोदी यांचा रास्त आग्रह होता. तो चुकीचा आहे, असे कोण म्हणेल. सुखवस्तू मुले आपापल्या परिघातच रमत असतात आणि पालकही त्यांना तेथून बाहेर पाठवण्याचा विचारही करत नाहीत. त्याऐवजी मुलांनी आपला परिघ सोडून सर्व वर्गातील मुलांमध्ये मिसळावे, राज्यात किंवा राज्याबाहेर फिरावे, तेथील स्थळांची माहिती घ्यावी, हा मोदी यांचा सल्ला अत्यंत उपयोगी ठरू शकतो. विद्यार्थ्यांचे पूर्वी दोन गट असायचे. एक उडाणटप्पू आणि दुसरा अभ्यासू. पण आता सर्वांनाच मोदींच्या या कार्यक्रमाने जवळ आणले आहे. तसे तर हे एक जनआंदोलन झाले आहे. कुचेष्टा करण्याचा टप्पा मागे पडून आता परीक्षा पे चर्चा हा गांभीर्याने घेण्याचा विषय झाला आहे आणि यासाठी मोदी यांचे मौलिक मार्गदर्शन कारण ठरले आहे. केवळ पंतप्रधान बोलतात म्हणून विद्यार्थी ते ऐकतात असे नव्हे तर खरोखरच त्यातून निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. हे मान्य करायला संकोच करण्याचे कारण नाही.