आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात
मविआच्या काळात वरुण सरदेसाईला संरक्षण का दिलं?; राऊतांच्या टीकेवर नितेश राणे यांचं प्रत्युत्तर
मुंबई : दिल्ली येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर लगेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेताल टीका करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरासमोर आज गोळीबाराची घटना घडली. यावरुन संजय राऊतांनी सरकारच्या गृहखात्याला लक्ष्य केले. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपाच्या जाहीरनाम्यावर आणि मोदीजींच्या दहा वर्षांच्या प्रवासावर टीका करताय, पण त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्यासोबत होता आणि तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात’ असा घणाघात नितेश राणे यांनी केला. त्याचबरोबर मविआच्या काळातील संरक्षणाचे दाखले देत नितेश राणे यांनी राऊतांना सुनावलं आहे.
संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, भाजपा आणि एनडीएने आज १४ एप्रिललाच जाहीरनामा कसा प्रकाशित केला, यावर हे महाशय भाष्य करतात. दहा वर्षे मोदीजींच्या पूर्ण प्रवासावर टीका हा संजय राऊत करतो. पण २०१४ आणि २०१९ मध्ये जो जाहीरनामा आम्ही बाहेर काढला होता त्याचा भाग तुम्हीदेखील होतात. तुम्ही स्वतःच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी मोदीजींच्या सरकारचा जाहीरनामा वाचून दाखवत होतात. दहा वर्षांवर टीका करत असताना त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्याबरोबरच होता. मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा कडू वाटला नाही? संविधान धोक्यात वाटलं नाही? तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात. म्हणून आता तुमच्या टीकेला जनता महत्त्व देत नाही, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.
आमच्या सरकारमध्ये प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची
नितेश राणे म्हणाले, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज फायरिंग झाली. मी परत एकदा राज्यातल्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या महायुती सरकारची आहे. देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने राज्याला अतिशय कर्तबार असे गृहमंत्री लाभलेले आहेत. म्हणून कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास मी देतो, असं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला त्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर नितेश राणे यांनी परखड भाष्य केले. यावेळेस त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.
नितेश राणे म्हणाले, संजय राऊतसारख्या लोकांना समजलं पाहिजे की हे काय मविआचं सरकार नाही. उद्धव ठाकरे इथे मुख्यमंत्री नाही. जिथे मोठमोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटिनच्या काड्या ठेवायच्या आणि मग सचिन वाझेंसारख्या पोलीस उपायुक्तांनी या संपूर्ण षडयंत्राचा भाग व्हावं, असं इथे घडत नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं नितेश राणे म्हणाले.
मविआच्या काळात वरुण सरदेसाईला संरक्षण का दिलं?
पुढे ते म्हणाले, संजय राऊत टीका करतो, की चिल्लर चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण दिलं जातं, मग मविआच्या काळात वरुण सरदेसाईला संरक्षण का दिलं गेलं होतं? मातोश्रीमध्ये भाजी आणून देणार्या, भांडी उचलणार्या लोकांनाही तेव्हा संरक्षण दिलं होतं आणि महत्त्वाची लोकं म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे ज्यांना खरी सुरक्षेची गरज होती त्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचं काम मविआने केलं होतं, असा आरोप नितेश राणे यांनी केला.