मुंबई : कोरोनाचे आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक (Measles outbreak) होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
प्रामुख्यानं लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवर आजाराचं प्रमाण वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ७१७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३०३ प्रकरणं मुंबईत आढळून आली आहेत. आतापर्यंत या आजारानं महानगरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.
गोवर हा एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. हा आजार सहसा फक्त मुलांमध्ये होतो. त्यामुळं २८ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई स्थानिक संस्थेच्या बुलेटिननुसार, मंगळवारी मुंबईत गोवरच्या पाच नवीन रुग्णांची नोंद झालीय. संशयित आजारानं एकाचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.
या वर्षी जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ७० आणि मुंबईजवळील भिवंडीमध्ये ४८ रुग्ण आढळले आहेत. या वर्षात आतापर्यंत मुंबईत गोवरच्या प्रादुर्भावाचे ७४ रुग्ण आढळले आहेत.