मुंबई (प्रतिनिधी) : कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशी आयोगाकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी आयोगासमोर हजर राहावे किंवा वकिलामार्फत बाजू मांडावी, असे निर्देश या समन्सद्वारे देण्यात आले आहेत.
त्यापूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे मांडण्याचीही मुभा आयोगाने सिंग आणि शुक्ला यांना दिली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराची घटना घडली त्या जवळपासच्या काळात परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर होते आणि रश्मी शुक्ला या त्या घटनेच्या काळात पुणे शहराच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यामुळे या दोन्ही कार्यालयांमध्ये संबंधित वेळेतील घटनांविषयीची काही माहिती असू शकते.