कोल्हापूर (प्रतिनिधी): टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना व्हावा, असे मला वाटते. खेळाकडे खेळ म्हणून पाहिले पाहिजे. त्याला वादात अडकवणे योग्य ठरणार नाही, असे मत माजी कसोटीपटू, पद्मश्री सय्यद किरमाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संस्कार हिअरिंग सोल्युशनच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी होत आहे. यावर, वास्तविक पाहता भारत-पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडूंचे संबंध स्नेहाचे राहिले आहेत. या दोन्ही संघातीलच नव्हे तर कोणत्याही संघाने मैदानावर उतरल्यावर निखळ व्यावसायिक भूमिका निभावली पाहिजे. इंग्लंड -ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेत कडवी झुंज दिसून येते. त्याप्रमाणेच भारत-पाकिस्तान यांच्यात सामन्यावेळी संघर्ष जरूर आहे. खेळ हा शांतता प्रस्थापित करण्याचा भाग आहे. खेळाडूंमध्ये ही हीच भावना आहे. हा विषय सोडून अन्य विचार केला जाऊ नये, असे सय्यद किरमाणी यावेळी म्हणाले.
वास्तविक पाहता भारत-पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडूंचे संबंध स्नेहाचे राहिले आहेत. या दोन्ही संघातीलच नव्हे तर कोणत्याही संघाने मैदानावर उतरल्यावर निखळ व्यावसायिक भूमिका निभावली पाहिजे. – सय्यद किरमाणी, माजी क्रिकेटपटू