रोहित शर्मा आऊट झाल्याचा आनंद व्यक्त केल्याने चेन्नईच्या चाहत्याची हत्या
कोल्हापूर : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार चर्चा आहे. चाहते वेड्यासारखे हे सामने पाहत असतात. त्यातच मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नईदरम्यान (Chennai Super kings) कायमच अटीतटीचा सामना पाहायला मिळतो. त्यांचे चाहतेही कट्टर असतात. मात्र, कोल्हापुरात (Kolhapur) ही कट्टरता इतक्या टोकाला गेली की त्यामुळे एका क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमीचा मृत्यू झाला आहे. चेन्नईच्या एका चाहत्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद होताच आनंद व्यक्त केल्याने मुंबईच्या दोन चाहत्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याचं डोकं फुटून गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांससह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामना झाला. हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते होते. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना चांगलाच राग आला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले.
या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहते असलेल्या बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) यांनी आनंद व्यक्त केला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी रागात बळवंत महादेव झांजगे (वय ५०) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५, दोघे रा. हणमंतवाडी) यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. २७ मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत बंडोपंत बापूसो तिबिले गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलिसही चक्रावून गेले.
आयपीएल सामन्यांमध्ये कोणाचीही हार किंवा जीत झाली तरी खेळाडू आणि संघाचे मालक बक्कळ पैसा कमवत असतात. मात्र, या खेळापायी झपाटलेले चाहते नको त्या गोष्टी करुन बसतात. कोल्हापुरातील या घटनेमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे.