ठाणे (वार्ताहर) : ठाणे येथील तीन हातनाका परिसरातील सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांनी ११ मार्चपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जुलै २०२२ पासून ते मार्चपर्यंत थकित पगार न मिळाल्याने सुपर मॅक्स कंपनीचे कामगार आक्रमक झाले आहेत. सुपर मॅक्स कंपनी बंद पडून जवळपास दीड वर्ष झाले. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्या जाऊन अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशात कंपनीने कामगारांचे थकवलेले पगार कामगारांना द्यावेत या मागणीसाठी कंपनी बाहेर तब्बल १२०० कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या कंपनीचे काही कामगार निवृत्त झाले आहेत, काही आजारी तर काही कामगार हयात नाहीत. कामगारांना अर्धा पगार देण्याचे आश्वासन असुनही त्यांना अजून पगार मिळालेला नाही. आक्रमक कामगारांनी ११ मार्चपासुन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पण तरीही कंपनी प्रशासनाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्याचा कोणताही पाठपुरावा झालेला नाही.
तब्बल २ महिने साखळी उपोषण करुनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कामगार म्हणतात की “कामगार दिनानिमित्त आनंद व्यक्त करावा की रोजगारासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणीचं दु:ख व्यक्त करावं? हेच समजत नाही.”