नासिक ( प्रतिनिधी )- स्मार्ट सिटी कंपनीने महानगरपालिकेला २५ कोटी रुपये देण्यासंदर्भात तत्वतः मान्यता दिली असून लवकरच हे पैसे पालिकेकडे वर्ग होतील, असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
स्मार्ट सिटी कंपनी स्थापन झाल्यापासून मनपाने आपल्या हिश्श्यापोटी स्मार्ट सिटी कंपनीला आतापर्यंत रु. २०० कोटी दिलेले आहेत. त्यापैकी १५० कोटी रु. स्मार्ट सिटी कंपनीने बँकेमध्ये मुदत ठेवी स्वरुपात ठेवलेले होते. कंपनीचे अध्यक्ष सिताराम कुंटे यांच्याकडे याबाबतचा विषय काढून महानगरपालिकेला सद्य स्थितीत १५० कोटी रुपये विविध विकास कामांसाठी वर्ग करावेत, अशी मागणी सातत्याने केली होती. तसेच अनेक वेळा स्मार्ट सिटीच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा केली होती. परंतु स्मार्ट सिटीने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करुन शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिलेला नाही. ही रक्कम स्मार्ट सिटी कंपनीने बॅंकेत ठेव म्हणून ठेवलेली आहे. त्याकारणाने मनपाची विकास कामे वेळेत होऊ शकली नाहीत.
स्मार्ट सिटीचे नव्याने नियुक्त झालेले मुख्यअधिकारी सुंमंत मोरे यांच्या समवेत चर्चा करुन बँकेत ठेवलेल्या १५० कोटी रुपयांचे व्याज मनपाला वर्ग करावे, असे सुचित करण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी सकारात्मक विचार करुन व्याजापोटी मिळणारी २५ कोटींची रक्कम मनपास वर्ग करण्याचे तत्वता मान्य केले. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेला विकास कामांसाठी नव्याने २५ कोटी रु. उपलब्ध होणार असल्याने निधी अभावी प्रलंबित ठेवण्यात आलेली विकासाची कामे मार्गी लागणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.