Sunday, May 5, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईत गारठा वाढला, पारा आणखी घसरणार का?

मुंबईत गारठा वाढला, पारा आणखी घसरणार का?

मुंबई : मुंबईत आज, गुरुवारी सकाळी थंडीचा जोर वाढल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली. दुपारपर्यंत हवेत गारवा होता. मुंबईत या मोसमात पहिल्यांदाच किमान तापमानाने निचांकी गाठली.

फारशा थंड हवेची सवय नसलेल्या मुंबईकरांना पारा १८ अंशांखाली गेला तरी गारव्याची जाणीव होते. मुंबईमध्ये सध्या गारठा आहे. गेल्या आठवड्यात १९ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होते.

त्यानंतर सोमवारपासून पारा आणखी खाली घसरू लागला. सांताक्रूझमध्ये नोंद झाल्यानुसार, गेले दोन दिवस १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर गुरुवारी सकाळी पारा १८ अंशांच्या खाली उतरला. यंदाच्या ऋतुमधील हे मुंबईतील सर्वात कमी तापमान आहे.

‘ऑक्टोबर हिट’ने हुलकावणी दिली, मात्र ती कसर नोव्हेंबरमध्ये भरून काढली. नोव्हेंबरमध्ये किमान तापमानाचा पारा २५ अंशांपलीकडेही काही वेळा गेला होता. डिसेंबरच्या पंधरवड्यातही किमान तापमानाने थंडीची जाणीव करून दिली नाही. पहिल्या १५ दिवसांमध्ये एकच दिवस १८.५ अंश सेल्सिअसपर्यंत मुंबईचे तापमान उतरले आणि धुक्याचा अनुभव घेता आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा किमान तापमानाने उसळी घेतली होती.

मात्र आता मुंबईमध्ये तापमान उतरून किमान काही काळ गारठ्याचा अनुभव घेता येतो. या आठवड्यामध्ये हा अनुभव मुंबईकरांना घेता आला आहे. पारा घसरल्याने मुंबईत गारठा वाढला आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या १० वर्षांमध्ये १७ अंशांखालीही तापमान गेले आहे.

आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान १०.६ अंश सेल्सिअस होते. ही नोंद सन १९४९ मधील आहे. आता गुरुवारपेक्षा किमान तापमान खाली उतरणार का, यासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -