Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिककोलाजChidhood : बालपणीचा काळ सुखाचा...

Chidhood : बालपणीचा काळ सुखाचा…

  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

बालपण सोनेरी पान, क्षण आनंद, राग, रुसवा, हट्ट, मौज गंमतजंमत सारं. बालपण देगा देवा खरंच आहे. तसं पाहिलं आयुष्यात एक असा काळ असतो की जेव्हा जबाबदारीचे ओझं नसतं. संगत, सोबत, नाच, गाणी, कविता, खेळ, शाळा, आनंद मात्र भरपूर. असा वेळ असतो आणि तेव्हा असं वाटतं की आपण उंच, मोठे होत आपले हात टेकावेत. बालपणाचा तो सुवर्णक्षण अत्तराच्या कुपीत सुगंध आठवतच, अविस्मरणीय अनुभवांचे. प्रत्येक मनाला एक हुरहुर चिंता भय दटावीत असते, दबाव दडपण असतं, आपल्याला ओरडत आहेत आपल्या भल्यासाठीच. पाण्यात जाऊ नको! रस्ता नीट क्रॉस कर! अभ्यास केलास का? मार खाशील! खाडा करू नको! खोटं बोलू नको! उंचावरून उडी मारू नको या सगळ्या गोष्टींमध्ये आपली काळजी आपल्यासोबत असते. जेव्हा आपल्याला त्यांची सवय होते, तेव्हा आपण जगू शकत नाही ती असतात मोठी माणसं. आजी-आजोबा, आई, मावशी, मामा, बाबा, आत्या खूप काळजी घेतात डोळ्यांत तेल घालून अगदी लहानपणापासून. कपडे, खेळणी, खाऊ घेऊन येत. आनंद नकळत्या वयामध्ये कळणं हे फार दुर्मीळ असतं.

अशाच एका टप्प्यावरती जेव्हा काही स्पर्धांमध्ये भाग घेतो आपल्याला कौतुक, प्रोत्साहन, बक्षीस, मिळतं आणि सुप्त कलागुणांना सुद्धा वाव. म्हणून म्हटलेलं आहे की हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी. असं वाटत की, उंच फळीवरचा लाडवाचा डबा कधी काढता येईल? तीन दगडांची छोटीशी चूल, भातुकलीचा खेळ, मग छानपैकी त्याच्यावरती खेळ खेळताना आपण चहा, चपाती तो आनंद दाटूमुटीचा ढेकर पोट भरतं.

जेव्हा मोठे होतो त्याचं कामांचा कंटाळा येतो, जबाबदारीचे ओझं वाटतं. मग वास्तवाचे चटके, त्या तव्याला लागणारे, संघर्षाचे फटके कळतात. जोपर्यंत आपण लहान आहोत सगळ्यांच्या आधाराची सवय झाली असते.‌ मोर, चांदोबा, पावसाची, चिऊ काऊची गाणी आजही मनाला ओली चिंब करतात. त्याच आठवणींचा एक सुंदर कप्पा आपण कुणाचं तरी हाताला बोट पकडून रस्ता ओलांडतो. पावसात भिजताना कडेवर घेतलं जायचं. कधी कधी आपल्याशी खेळायला नसेल, तेव्हा चक्क आजी-आजोबा आपल्या वयाचे होऊन आपल्याशी खेळतात. गोष्टीत बालपण नेहमी पुढे सरकत असतं.

कालानुरूप या बालपणच्या गोष्टी सुंदर आठवणींचा इमला त्याला म्हणावं लागेल असा असतो. सुगंधी, अत्यंत प्रिय, अप्रतिम, हव्याहव्याशा, आनंददायी आठवणी. तेव्हा बालमनाला प्रश्न निर्माण होतात. आपण कुणाकुणाला विचारत असतो हे असं का, ते तसं का? फार गमतीदार असतात. हे मन कोवळी, नाजूक, गुजगोष्टी करणारी, नाना प्रश्न पडणारी, नाना प्रश्नांचे उकल शोधणारी, बागडणारी, खुदकन हसणारी, क्षणात नाचणारी, लाजणारी, स्वच्छंदी बागडणारी, क्षणात रागावणारी हे अनुभव बालपणीच्या आठवणी हृदयावर सुंदर अशा कोरीव लेण्याप्रमाणे कोरलेल्या हव्याहव्याशा वाटतात.

कधी कधी परिस्थितीचा बागुलबुवा असतो, भीती असते, कधी मनावर ओरखडे ओढलेले असतात, कधी कधी बिंबलेल्या असतात. सुट्टी असते, तेव्हा खूप आनंद वाटतो. पण सकाळी उठून जेव्हा शाळेत जायचे असते, तेव्हा मात्र झोप अनावर होते. कधी कोणी ओरडले, तर हिरमुसून बसतो दटावले खोड केली तर.

अशा छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात असतात. बालमनाला तिथे दुःख होतं. जसं मोठं होत जातो, तशा त्या गोष्टी क्षुल्लक. लहानपणी त्याचं फार मोठं आपण अक्राळविक्राळ स्वरूप करून आपण बाऊ करतो. मॅडमने वर्गामध्ये शिक्षा केली, सर्वांसमोर काही बोललं तरी सुद्धा खूप वाईट वाटते. पाहुण्यांसमोर अपमान झाला एक तर गोष्ट अशी सांगावीशी वाटते की पाहुण्यांनी गिफ्ट, खाऊ काय आणला, आपण हे त्यांच्यासमोरच उघडत असतो. घरचे डोळ्यांनीच आपल्याला खुणावतात हे चुकीचं आहे! मग तेव्हा कळतं आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण ना परिस्थितीचं भान, प्रत्येक गोष्टीची घाई असते एखादी गोष्ट चटकन मनातली व्यक्त होणं, भावना व्यक्त होणे, कोडं पडलं, प्रश्न पडला, उत्तर सापडलं, आनंद झाला, रडू आलं या व्यक्त होण्याला सुद्धा. बालपण इतकं निरागस, गोजिरवाणं, निखळ, नितळ, निष्पाप, बालिश असतं.

त्या त्या वयामध्ये ते आनंददायी असतं आणि म्हणून बालपण हे आयुष्याचं सोनेरी पान रुपेरी रूप असतं अशा या बालपणातल्या गोष्टी गमतीशीर सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. मन दुखावलं, तर त्यांची समजूत सामंजस्यानं सुसंवाद साधून त्यांच्याच भाषेत त्यांना शिस्त, वळण, संस्कार दिले जातात रम्य बालपण!

बालपणीचा काळ सुखाचा!! लाडोबा ससोबा आयतोबा सोनू मोनू पप्पू राणी अशा नावांनी आपल्यालाही कुणीतरी लहानपणी पुकारलंच असेल ना आहे की नाही न्यारी गंमत तुमच्याही बालपणाची.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -