इस्रोने भारताची मान आणखी उंचावली!
मुंबई : २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची (ISRO) चांद्रयान-३ मोहिम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ (South pole) उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जगभरातून भारताचे कौतुक करण्यात आले. यानंतर आता इस्रोने भारताची मान उंचावेल अशी आणखी एक कामगिरी केली आहे.
इस्रोच्या चांद्रयान मोहिमेने अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार’ (Aviation Week Laureates Award) पटकावला आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आला. “इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ (S. Somanath) यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला.” असं अधिकृत अवॉर्ड घोषणेत म्हटलं होतं.
Another accolade for 🇮🇳 Chandrayaan-3!
On behalf of @ISRO, Cd’A Sripriya Ranganathan @ranganathan_sr received the prestigious @AviationWeek Laureates Award which recognizes extraordinary achievements in aerospace industry. The award noted #Chandrayaan-3’s landing at the lunar… pic.twitter.com/l1OJj2JfUw
— India in USA (@IndianEmbassyUS) March 18, 2024
यात पुढे म्हटलं आहे, “अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे.” इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.