Friday, August 28, 2026

Ahilyanagar : भाजप जिल्हा उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, नेवासात तणाव

Ahilyanagar : भाजप जिल्हा उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, नेवासात तणाव

Ahilyanagar : अहिल्यानगरमधून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरच्या नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. तब्बल 90 ते 100 जणांच्या जमावाने शेटे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या कारचीही तोडफोड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जमावातील काही जणांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नेवासा परिसरात एकच खळबळ उडाली असून, अहिल्यानगरमधील राजकीय वातावरणही तापले आहे. (Ahilyanagar Crime News)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नेवासा येथे ही घटना घडली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे हे ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत होते. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे पथक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र, या कारवाईला काही फेरीवाल्यांनी तीव्र विरोध केला आणि त्यातून वाद निर्माण झाला. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत वाद सुरू असतानाच ऋषिकेश शेटे यांची कार त्या पथकाच्या मागून जात होती. त्यामुळे काही फेरीवाल्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला. या गैरसमजातून काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी शेटे यांच्या कारला घेराव घालत तिची तोडफोड केली. त्यानंतर जमावाने ऋषिकेश शेटे यांच्यावरही हल्ला केल्याची माहिती आहे. (Ahilyanagar Crime News)

पोलिसांची तातडीने कारवाई सुरू

या हल्ल्यात जमावातील काही जणांनी शेटे यांच्या हातावर चाकूने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच नेवासा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाचा प्रतिकार करत ऋषिकेश शेटे यांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती आहे. या घटनेत नगरपंचायतीचे सीओ आणि पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. या प्रकरणी रात्री उशिरा तब्बल 90 ते 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतले असून, मिळालेल्या माहितीनुसार ही संख्या 7 ते 8 जणांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संशयितांचा शोधही सुरू आहे. (Ahilyanagar Crime News)

अफवांवर विश्वास ठेवू नका , पोलिसांचे आवाहन

या घटनेनंतर नेवासा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, घटनास्थळी शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >