Nashik : देशभरात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून पहिली कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता मनमाडहूनही कांदा एक्सप्रेस धावणार आहे. मनमाड रेल्वे स्थानकातून (Manmad Railway Station) तब्बल ८०० मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवला जाणार आहे. यासाठी रेल्वेच्या २१ बोगींमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू असून, संध्याकाळपर्यंत ही कांदा एक्सप्रेस चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे. (Nashik News)
कांदा एक्सप्रेस आता चेन्नईला
कांद्याच्या दरात वाढ होताच केंद्र सरकारने बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्याचे नियोजन केले आहे. याच अंतर्गत दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातून (Lasalgaon Railway Station) ४५० मेट्रिक टन कांदा घेऊन पहिली कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर आता मनमाड रेल्वे स्थानकातूनही कांदा एक्सप्रेस चेन्नईला पाठवण्यात येत आहे. त्यासाठी मनमाडच्या रेल्वे मालधक्क्यावर कांदा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Nashik News)
Shalarth ID Scam : नाशिकच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयातून अचानक ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर
नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफने साठवून ठेवलेल्या गोदामांमधून हा कांदा ट्रकच्या माध्यमातून मनमाडमध्ये आणला जात आहे. सुमारे २१ डब्यांच्या रेल्वेतून तब्बल ८०० मेट्रिक टन कांदा चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात कांद्याचा पुरवठा वाढून दरात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून कांदा बाजारात पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, मनमाडहून पाठवण्यात येणाऱ्या बफर स्टॉकमधील कांद्यात काहीसा खराब आणि हलक्या प्रतीचा कांदा असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे कांद्याच्या गुणवत्तेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (Nashik News)
मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथून दिल्लीच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना होत असताना प्रहार संघटनेच्या तालुका अध्यक्षांकडून ही कांदा एक्सप्रेस अडवण्यात आली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून या आंदोलनामुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक जिल्हा पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.






