Wednesday, August 19, 2026

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जुहू समुद्र किनाऱ्यास मंगळवारी १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी प्रत्यक्ष भेट दिली. जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा महापौर तावडे यांनी सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीप्रसंगी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड, स्थानिक नगरसेविका सुधा सिंग, सहआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना अधिकाऱ्यांनी नमूद केले की, जुहू समुद्र किनारा सुमारे सात किमी लांब आहे. यापूर्वी पावसाळ्यात उंच लाटांमुळे जुहू किनाऱ्यावर दररोज सुमारे १२० मेट्रिक टन कचरा वाहून येत होता. दररोज किनारा स्वच्छ तो कचरा पूर्णपणे वाहून नेला जायचा. यंदाच्या पावसाळ्यात जुहू किनाऱ्यावर कचरा वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज सुमारे २०० ते २५० मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर येतो. पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन सत्रात प्रत्येकी ७५ असे एकूण १५० मनुष्यबळ स्वच्छता करतात. किमान १८० टन कचरा दररोज उचलला जातो. वाढत्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर २ बीच क्लिनिंग मशिन्स, ४ बॉबकॅट्स, २ पोकलेन, २५ डंपर्स, ४ ट्रॅक्टर ट्रॉली, २ जेसीबी, १ बुलडोझर अशी यंत्रणा तैनात करून स्वच्छतेची कार्यवाही अथकपणे केली जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर आणि किनाऱ्यावर पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता अखंडपणे सुरू ठेवून काम अधिक गतिमान करण्याचे निर्देश आज पुन्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील प्रशासनाला पत्र पाठवून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचना मी केल्या होत्या. तसेच, या किनाऱ्यावर कचरा टाकू नये, या आशयाचे नागरिकांना आवाहन करणारे जनजागृतीपर फलक तत्काळ लावावेत, अशी सूचना देखील केली आहे. मुंबईचे समुद्र किनारे हे स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहेत. हे किनारे सदैव स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी अथवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा न फेकता योग्य पद्धतीने, कचरा पेटी आणि कचरा डब्यांमध्ये टाकावा, योग्य विल्हेवाट लावावी. मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ राखण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.

या पाहणीनंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महापौर रितू तावडे यांनी त्यांना प्रोत्साहित केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >