Wednesday, August 19, 2026

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा ५-३ असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने स्पर्धेच्या पुढील फेरीत म्हणजेच क्रॉसओव्हर फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध गेल्या १६ वर्षांपासून चालत आलेला भारताचा वरचष्मा या सामन्यातही कायम राहिला आहे. २०१० पासून आजतागायत भारताला पराभूत करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

पहिल्या हाफमधील भारताचा गोलांचा पाऊस:

सामना सुरू झाल्यापासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. पहिल्या १५ मिनिटांच्या पहिल्या क्वॉर्टरमध्येच भारताने जोरदार सरशी घेतली. सामन्याच्या अवघ्या पाचव्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ ११व्या मिनिटाला अभिषेकच्या पासवर आलेल्या संधीचे सोन करत मनदीप सिंगने हॉकीच्या हलक्या स्पर्शाने दुसरा गोल नोंदवला. यामुळे भारताने पहिल्या क्वॉर्टरमध्येच २-० अशी भक्कम पकड बसवली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्येही भारताचा हाच धडाका सुरू राहिला. २१व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत स्कोर ३-० केला. तथापि, पाकिस्ताननेही पुनरागमान करण्याचा प्रयत्न केला आणि सुफियान खानने २२व्या व २५व्या मिनिटाला गोल करत अंतर कमी केले. यादरम्यान भारताच्या अभिषेकने २४व्या मिनिटाला एका अप्रतिम ड्रिब्लिंगवर सुरेख मैदानी गोल करत भारताची बाजू भक्कम ठेवली. पहिल्या हाफपर्यंत भारताने ४-२ अशी आघाडी कायम राखली होती.

दुसऱ्या हाफमधील चुरस आणि विजय:

सामन्याच्या उत्तरार्धात खेळाची रंगत आणखी वाढली. काही तांत्रिक कारणांमुळे भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले, ज्याचा फायदा घेत पाकिस्तानने जोरदार हल्ले चढवले. मात्र, भारतीय बचावफळीने उत्तम संयम राखला. या सत्रात भारताला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हार्दिक सिंगने अचूक निशाणा साधत भारताचा पाचवा गोल नोंदवला आणि स्कोअर ५-२ केला. त्यानंतर पाकिस्तानकडून शाहिदने आणखी एक गोल केला, ज्यामुळे सामना ५-३ असा रंगला. अखेरच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली, परंतु भारतीय खेळाडूंनी बचावात सातत्य राखत हा सामना ५-३ ने आपल्या नावावर केला. या पराभवासह पाकिस्तानचे चालू विश्वचषकातील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >