Friday, August 14, 2026

Ganeshotsav : गणपती बाप्पा मोरया ! विघ्नहर्त्याचे कृपेने गणेशोत्सवातील मोठे विघ्न टळले; गणेश भक्त, मूर्तिकार, कामगार, गणेशोत्सव मंडळांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Ganeshotsav : गणपती बाप्पा मोरया ! विघ्नहर्त्याचे कृपेने गणेशोत्सवातील मोठे विघ्न टळले; गणेश भक्त, मूर्तिकार, कामगार, गणेशोत्सव मंडळांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : गणेश मूर्ती विसर्जनाबाबत गतवर्षी म्हणजे २०२५ ला न्यायालयाने दिलेल्या निवाड्या प्रमाणे याही वर्षी विसर्जन करता येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांना, मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. याबद्दल न्यायालयासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अखिल सार्वजनिक गणेशोत्सव समितीने आभार मानले आहेत.

पीओपी मुर्तीच्या विसर्जनाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी नंतर आज न्यायालयाने निकाल राखून ठेवताना याही वर्षी सन २०२५ प्रमाणे म्हणजेच एक ते सहा फुटांच्या मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात तर त्यापेक्षा मोठ्या मुर्तीचे विसर्जन नैसर्गिक जल स्तोत्रात करता येणार आहे. त्यामुळे यावर्षी पुरता तरी तिढा सुटला आहे.

ही लढाई अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र राज्य यांनी न्यायालयात लढली असून या समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या लढ्यासाठी बळ देणारे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत. उत्सव मंडळांची बाजू न्यायालयात खंबीरपणे मांडणारे एडवोकेट उदय वारुंजीकर यांचेही आभार त्यांनी मानले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मूर्तिकार व या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार, चित्रकार या सगळ्यांची बाजू घेऊन ही संघटना गेली अनेक वर्ष सातत्याने ही लढाई लढत असून अखिल गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, कार्याध्यक्ष सुहास आडिवरेकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले. ही लढाई लढणारे अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव मूर्तिकार संघटनेचे सल्लागार जितेंद्र राऊत मूर्तिकार सिद्धेश दिघोळे, मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई, राहुल घोणे यांनी सर्व मूर्तिकार गणेशोत्सव मंडळे, विविध संघटना सरकार या सगळ्यांचे आभार मानताना या गणेशोत्सवातील विघ्न टळले, त्यामुळे हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव आणि सुहास आडिवरेकर यांनी सांगितले की, ही लढाई सोपी नव्हती. पण सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे ही भूमिका मांडतानाच, त्यांनी या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार, मूर्तिकार या सगळ्यांचा ही विचार केला. तसेच गणेशोत्सवाला असणारी १०० वर्षाची परंपरा लक्षात घेता ती खंडीत होणार नाही, त्यामध्ये विघ्न येणार नाही, या पद्धतीची भूमिका घेऊन सरकार आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच ही लढाई आम्ही इथपर्यंत लढलो. आणि याही पुढे लढू असा विश्वास या दोघांनीही व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा