नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्ट रोजी वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. या काळात काही मार्गांवरील वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Navi mumbai)
15 ऑगस्ट रोजी सानपाडा येथील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे 8 किलोमीटर लांबीची मानवी साखळी आणि सामूहिक 'वंदे मातरम' गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पहाटे 1 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत बेलापूर-वाशी/मुंबई/ठाणे दिशेचा मार्ग मोराज सर्कलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रम सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत होणार असून, किल्ला जंक्शन ते मोराज जंक्शनदरम्यान मानवी साखळी तयार केली जाणार आहे. (Traffic Restrictions)
या कालावधीत वाशी आणि बेलापूरदरम्यान दोन्ही दिशांची वाहतूक एकाच मार्गावरून वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांना उरण फाटा आणि सायन-पनवेल महामार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येईल. (Palm Beach Road Traffic)
- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली झाल्यानंतरही वर्षानुवर्षे शासकीय ...
दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी 'सिटी हेल्थ रन–2026' मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पहाटे 1 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू राहतील. बेलापूरहून वाशी, मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा मार्ग मोराज सर्कलच्या पुढे बंद करून वाहतूक विरुद्ध दिशेच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच बेलापूरमधील किल्ला जंक्शन ते एनआरआय जेट्टीकडे जाणारा डीपीएस स्कूलच्या बाजूचा मार्गही बंद राहणार आहे. ( Independence Day Traffic)
वाहतूक व्यवस्थापनासाठी हे निर्बंध तात्पुरते असून, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. मोटार वाहन कायदा 1988 मधील संबंधित कलमांनुसार हे वाहतूक आदेश जारी करण्यात आले आहेत.





