Sunday, August 23, 2026

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी कोकण-गोवा किनारपट्टीवरील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर तसेच विदर्भातील अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील बहुतांश भागांत पावसाच्या सरी कायम राहतील. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, घाट रस्त्यांवर घसरडी परिस्थिती निर्माण होणे आणि काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहरात आज असं राहिल वातावरण

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विशेषतः सखल भागातील रहिवासी आणि प्रवाशांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. आज दुपारी 2:43 वाजता 4.27 मीटरची उच्च भरती येणार आहे. त्यानंतर रात्री 8:50 वाजता 1.06 मीटरची ओहोटी असेल. तर 4 ऑगस्ट रोजी पहाटे 3:16 वाजता 3.84 मीटरची उच्च भरती आणि सकाळी 8:42 वाजता 1.53 मीटरची ओहोटी होणार आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत शहर भागात 19.56 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांमध्ये सर्वाधिक 65.77 मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये 44.37 मिमी पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांतही अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे आणि भरतीच्या वेळेत समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >