Sunday, July 26, 2026

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे मानले जात असून तब्बल २२ जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Weather)

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा :

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Weather)

उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस :

धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Weather)

घाटमाथ्यावर मुसळधार सरी :

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Weather)

मराठवाड्यात पावसाची हजेरी :

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यांतही तुरळक पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Monsoon Weather)

विदर्भातही पावसाचा प्रभाव :

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Monsoon Weather)

पुढील २-३ दिवस पावसाचा जोर कायम :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची सक्रियता कायम राहणार आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त क्षेत्रे आणि डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Weather)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >