Saturday, July 25, 2026

Eknath Shinde : गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तातडीने कार्यवाहीचे निर्देश

Eknath Shinde : गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तातडीने कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त राज्यातील सुमारे २ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाला "याप्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी" असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

पूर्वेश सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले होते. राज्यभर लाखो गोविंदा जीव धोक्यात घालून दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. सरावादरम्यान तसेच प्रत्यक्ष दहीहंडी फोडताना अनेक गोविंदांना दुखापती होतात. अनेक गोविंदा मंडळांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने उपचाराचा खर्च उचलणे कठीण जाते. त्यामुळे राज्यातील सर्व गोविंदांना व्यापक विमा संरक्षण देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे एक लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र यंदा हा लाभ वाढवून सुमारे दोन लाख गोविंदांना "महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन" या नियोजन समितीच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी सरनाईक यांनी केली होती.या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रावर "याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी" अशी स्पष्ट नोंद करून संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.याबाबत पूर्वेश सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत सांगितले की, "गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो गोविंदांना मोठा दिलासा मिळणार असून गोकुळाष्टमीचा उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात साजरा होण्यास मदत होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा