Friday, July 24, 2026

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस दल सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील महत्त्वाच्या शासकीय इमारती, संवेदनशील ठिकाणे तसेच व्हीआयपी नेत्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, 'वर्षा' बंगल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून वाहनांची व संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे. या परिसरात पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. याशिवाय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इतर काही मंत्री, खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानीही सुरक्षेसाठी जादा पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे.

मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात सुरक्षेची तटबंदी उभारण्यात आली आहे. प्रवेशद्वारांवर येणाऱ्या-जाणाऱ्यांची आणि वाहनांची बारकाईने तपासणी केली जात आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्याही राज्यातील अत्यंत संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.

मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलनाच्या मार्गावर आणि सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. राज्यातील सर्वच संवेदनशील भागांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असून, गुप्तचर यंत्रणांमार्फत क्षणाक्षणाच्या घडामोडींवर नजर ठेवली जात आहे. स्थानिक पोलिसांना सतत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा