Thursday, July 23, 2026

WTC Final 2027 चे वेळापत्रक जाहीर! 'द ओव्हल'वर रंगणार अंतिम सामना; गुणतालिकेत भारताची घसरण

WTC Final 2027 चे वेळापत्रक जाहीर! 'द ओव्हल'वर रंगणार अंतिम सामना; गुणतालिकेत भारताची घसरण

- ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमध्ये होणार अंतिम लढत; ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानावर

मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) २०२५-२७ हंगामाच्या अंतिम सामन्याची तारीख आणि स्थळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहे. ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमधील 'द ओव्हल' मैदानावर WTC फायनल खेळवली जाणार आहे. यापूर्वी २०२३ मध्ये याच मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. (WTC Final 2027)

आयसीसीने यापूर्वीच २०२७, २०२९ आणि २०३१ या तीनही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या इंग्लंडमध्येच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा WTC फायनल इंग्लंडमध्ये रंगणार आहे. (WTC Final 2027)

गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानी :

सध्या सुरू असलेल्या WTC २०२५-२७ चक्रातील गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. नियमांनुसार गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात. (WTC Final 2027)

सध्याची आघाडी अशी आहे:

१. ऑस्ट्रेलिया २. दक्षिण आफ्रिका ३. न्यूझीलंड ४. बांगलादेश ५. भारत

भारताची पाचव्या स्थानावरील घसरण ही संघासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

टीम इंडियासमोर मोठे आव्हान :

भारताने आतापर्यंत दोन वेळा (२०२१ आणि २०२३) WTC फायनल गाठली असली तरी एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. दरम्यान, कसोटी संघात मोठे बदल झाले असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे नव्या संघासमोर WTC फायनल गाठण्याचे मोठे आव्हान आहे. (WTC Final 2027)

भारताचे अजून ९ कसोटी सामने बाकी असून अंतिम फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी त्यापैकी किमान ८ सामने जिंकणे आवश्यक मानले जात आहे. मात्र हे आव्हान सोपे नाही. भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंकेत जाऊन कसोटी मालिका खेळायची आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची महत्त्वाची मालिका मायदेशात होणार आहे. (WTC Final 2027)

तीन संघांनी जिंकले WTC विजेतेपद :

आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी WTC विजेतेपदावर नाव कोरले आहे. भारत दोनदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचला असला, तरी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठण्याचे मोठे लक्ष्य टीम इंडियासमोर असणार आहे. (WTC Final 2027)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा