Tuesday, July 21, 2026

Bus Accidents Mumbai : मानखुर्दमधील बेस्ट बस दुघर्टनेची चौकशी करा, महापौरांनी दिले आदेश

Bus Accidents Mumbai : मानखुर्दमधील बेस्ट बस दुघर्टनेची चौकशी करा, महापौरांनी दिले आदेश

सात महिन्यात बेस्ट बसच्या १० अपघातात १० जणांचे मृत्यू

मुंबई : मानखुर्द येथील झालेल्या बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident) एका पादचाऱ्याचा मृत्यू आणि १० प्रवाशी जखमी झाले असून याचे तीव्र पडसाद महापालिका सभागृहात उमटले. त्यामुळे या वर्षांत दहा बेस्ट बसचे अपघात झाले असून त्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वारंवारच्या या बेस्ट बस अपघातांची चौकशी केली जावी अशी मागणी सभागृहात करत मृतांचे नातेवाईक आणि जखमींना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषात बदल करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.

मानखुर्द येथे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बेस्ट बस रस्ता दुभाजकावर चढून झालेल्या अपघात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहे. याबाबत शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक नगरसेविका अपेक्षा खांडेकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या अपघातच्या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेत याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच यातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत करण्याची मागणी केली. तसेच जिथे हा अपघात झाला आहे तिथे वारंवार अपघात होत असून याठिकाणी वाईन्स शॉप (Wine Shop) असल्याने गर्दी होते, तसेच अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत वाहने उभी केली जात असल्याचे सांगितले. यावर राजुल पाटील यांनी मागील काही दिवसांपासून भांडुपमध्येही (Bhandup) बेस्ट बस अपघात वाढले असून काही रस्ते चढ उताराचे असल्याने तसेच अरुंद असल्याने बेस्ट बस चालवणे जिकरीचे होेते. त्यातच बसच्या फेऱ्यांची संख्या कमी होत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून भांडुपला अर्धा तासात पोहोचाल पण भांडुप ते टेंभीनाका येथे पोहोचायला दीड तास लागतो अशी खंत व्यक्त केली. तर भाजपच्या साक्षी दळवी यांनी डिसेंबर ते जूनपर्यंत भांडुपमध्ये पाच बस अपघात झाले आहे. कोकण नगर येथे गाड्या वळतातही येत नाही. तर भांडुपमध्ये चिंचोळे रस्ते असल्याने मोठ्या बसेस ऐवजी मिनी बसेस सेवा देण्यात यावी अशी मागणी जागृती पाटील, ज्योती राजभोग आदी भांडुपमधील नगरसेविकांनी केली आहे. तर बेस्ट बस चालक रस्त्यावर थुंकत असतात, मोबाईलवर बोलत असल्याची तक्रार संध्या दोशी, सोनाली साबे यांनी केली. तर भाजपचे नवनाथ बन यांनी याप्रकरणांची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी केली. तर बेस्टचे गॅरजेसची क्षमता वाढवून चालकांना पगार वाढवण्याची मागणी सचिन पडवळ यांनी केली. त्यामुळे खासगी बसेसची देखभाल बेस्टच्या गॅरेजेसमध्ये करून त्याचा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करावा, म्हणजे याच्या अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी सूचना केली.

तर बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी मातेश्वरी कंपनीच्या बसेसचेच अपघात होत असून मागील काही दिवसांमध्ये १५ अपघात (Accidents) होवून १४ जणांचे बळी गेले आहेत तर जानेवार ते जुलै २०२६ या कालावधीमध्ये १० अपघातात दहा जणांचे बळी गेले आहेत. आता बेस्टच्यावतीने १५०० गाड्या भाडे तत्वावर घेतल्या जात असून या मातेश्वरी कंपनीकडून घेतल्या जात असल्याने याला आम्ही विरोध केल्याचे त्यांनी सांगितल. जिथे हा अपघात झाला होता तिथे अपघात होत असल्याने गतीरोधक बसवण्याची मागणी अपेक्षा खांडेकर यांनी केली होती. बेस्टच्या मालकीच्या बसेच २४९ बसेस असून उर्वरीत सर्व बसेस खासगी संस्थेच्या आहेत. त्यामुळे सर्व चालकांना किमान चार आठवड्यांचे प्रशिक्षण देण्याची सूचना केली असल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकाच कंपनीविरेाधात तक्रार असून चौकशी समितीमध्ये वाहतूक तज्ज्ञ, रस्ते सुरक्षा तज्ज्ञ आदींचा समावेश केला जावा अशी सूचना केली. तसेच अपघातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमी देण्यात येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यासाठी सुधारीत सर्वंकष धोरण आखणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चत सुषम सावंत, समृध्दी काते, सगणु नाईक, दिपमाला बढे, सनी सानप, अजित रावराणे,अर्चना भालेराव आदींनी चर्चेत भाग घेतला होता. या अपघाताप्रकरणी महापालिका आयुक्त यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून आणि याचा चौकशी अहवाल तयार करून महापालिका सभागृहाला सादर करावा असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी सभागृहात दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >