Sunday, July 12, 2026

BMC : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच रात्री पावणेतीन वाजेपर्यंत चालली सभा; तब्बल ११ तास चालवले सभागृह

BMC : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच रात्री पावणेतीन वाजेपर्यंत चालली सभा; तब्बल ११ तास चालवले सभागृह

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण आता नगरसेवकांच्या चिंतेचे कारण ठरताना दिसत असून शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुरु झालेल्या सभागृहाचे कामकाज शनिवारी पहाटेपूर्वी पावणे तीन वाजता संपले. तब्बल सलग ११ तास महापालिकेचे मध्यरात्रीपर्यंत चालले होते. अशाप्रकारचे कामकाज महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथम घडले असून नगरसेवकांची गैरसोय करून उशिरापर्यंत घेतल्या जाणाऱ्या सभागृहाच्या कामकाजामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. सभागाच्या कामकाजाऐवजी नगरसेवकांना वेठीस धरण्याचे काम महापौरांकडून होत असल्याचा सुरही आळवला जात आहे.(Bmc News)

मुंबईत पावसाळ्यात होणाऱ्या दुघर्टनांच्याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी महापालिका सभागृहात तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या कामकाजाला शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुरुवात झाली. या सभेमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या एकूण ४४ सदस्यांनी भाग घेत आरोप प्रत्यारोपांसह काही उपाययेजनाही सूचवल्या. परंतु, दुपारी तीन वाजता सुरु झालेली ही सभा शुक्रवारी उत्तररात्री म्हणजे २ वाजून ३५ मिनिटांनी संपली. तब्बल ११ तास ही सभा चालली आणि सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षानेही एकमेकांचे ऊणेधुणे काढून आपल्या मनातील भडास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ही सभा ज्या उपययोजना सुचवण्यासाठी आयोजित केली होती, त्यातून उपाययोजना काहीच हाती लागल्या नाहीत. उलट गटनेत्यांनी फर्मान सोडून कुठल्याही नगरसेवकांनी घरी जायचे नाही अशी सक्त ताकीद दिल्यामुळे डांबून मुटकून बसवल्याप्रमाणे काही नगरसेवक सभागृहात घड्याळाच्या पुढे सरकणाऱ्या काट्याकडे पाहत वेळ मोजत होते. त्यामुळे एकप्रकारची नाराजी नगरसेवकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

विशेष म्हणजे विशेष सभेसाठी ४ तासांपेक्षा अधिक तास चर्चा केली जावू नये अशी आजवरची परंपरा असतानाही महापौरांनी जाणीवपूर्वक उशिरापर्यंत सभा लांबवून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांसह आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आजवर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभा मध्य रा़त्रीपर्यंत चालल्या होत्या, तसेच इतर सभाही आता १२ वाजेपर्यंत चालवल्या जात आहेत. त्यातच शुक्रवारच्या सभेने शनिवार उजाडलेला पाहिल्याने आता नगरसेवकांच्या डोक्यावर पाणी जायला लागल्याचे दिसून येत आहे. त्यातून ही नाराजी भविष्यात उफाळून येण्याची शक्यता आहे. महापालिकेने आजवर कधीही एवढ्या उशिरापर्यंत सभा चालवल्या नसून भाजपच्या सत्ताकाळात सध्या १२० पेक्षा अधिक महिला नगरसेविका असतानाही त्यांना रात्री अपरात्रीपर्यंत सभागृहात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सभागृहाचे कामकाज योग्यप्रकारे व्हावे यासाठी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत सभागृहाचे कामकाज केले जावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >