Tuesday, July 7, 2026

Central Railway : दरडीनंतर मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! तब्बल ८० हजार प्रवाशांना ६ कोटींचा परतावा; गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

Central Railway : दरडीनंतर मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! तब्बल ८० हजार प्रवाशांना ६ कोटींचा परतावा; गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

कर्जत–लोणावळा दरम्यान ६ जुलै रोजी दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या, तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास खोळंबला. मात्र या परिस्थितीत मध्य रेल्वेने तातडीने पावले उचलत प्रभावित प्रवाशांना विक्रमी वेगाने परतावा दिला. (Central Railway)

मध्य रेल्वेने ६ जुलै २०२६ रोजी ७९,७४७ प्रवाशांना तब्बल ५.९१ कोटी रुपयांचा परतावा वितरित केला. गेल्या वर्षी याच दिवशी ३८,६८७ प्रवाशांना ३.०१ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला होता. यंदा परतावा मिळालेल्या प्रवाशांच्या संख्येत १०६ टक्के, तर परताव्याच्या रकमेत ९६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. (Central Railway)

मुंबई विभागात २.८६ कोटींचा परतावा :

मुंबई विभागात ६ जुलै रोजी ३७,३३० प्रवाशांना २.८६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. गेल्या वर्षी याच दिवशी १७,४९० प्रवाशांना १.४२ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला होता. म्हणजेच प्रवाशांच्या संख्येत ११३ टक्के, तर परताव्याच्या रकमेत १०१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पुणे विभागातही विक्रमी वाढ :

पुणे विभागात २०,९८२ प्रवाशांना १.५६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. मागील वर्षी हीच संख्या ९,६८९ प्रवासी आणि ७४.४६ लाख रुपयांपर्यंत मर्यादित होती. यंदा परतावा मिळालेल्या प्रवाशांच्या संख्येत ११६ टक्के, तर परताव्याच्या रकमेत १०९ टक्क्यांची वाढ झाली आहे. (Central Railway)

अतिरिक्त कर्मचारी, विशेष हेल्प डेस्कची सुविधा :

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले. तसेच परताव्याच्या विनंत्यांवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी विशेष 'हेल्प डेस्क' सुरू करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असूनही प्रवाशांना वेळेत परतावा मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. (Central Railway)

प्रवासापूर्वी गाड्यांची स्थिती तपासा :

रम्यान, कर्जत–लोणावळा मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी, तसेच आवश्यक असल्यास रेल्वे हेल्पलाइन किंवा जवळच्या स्थानकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Central Railway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा