Tuesday, July 7, 2026

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara :राठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत असून सातारा (mahabaleshwar) जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर म्हणजेच 20 इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचा हा पाऊस शतकातील सर्वाधिक पावसांपैकी एक मानला जात आहे.

डोंगरी भागातील जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरमध्ये (mahabaleshwar) अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून, ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. जिल्ह्यात कुठे रस्ते खचले आहे तर कुठे झाडे उन्मळून पडली आहे. तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. महाबळेश्वरमध्ये (mahabaleshwar) झालेली 513 मिलिमीटर पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाच्या नोंदींपैकी एक ठरली असून, निसर्गाने आपल्या रौद्ररूपाचे दर्शन घडवले आहे.

दरम्यान, या तांडव करणाऱ्या विक्रमी पावसामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे महाबळेश्वर मधील धबधबे, वेण्णा लेक, तलाव दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे हा मुसळधार पाऊस नागरिकांसाठी मोठे संकट ठरत आहे. महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे.

८ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार

दरम्यान, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली असली, तरी संपूर्ण राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. आता ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, ही परिस्थिती किमान पुढील दहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. विशेषतः खानदेशातील धुळे आणि नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर, तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >