Wednesday, July 8, 2026

India Indonesia Agreements : भारत-इंडोनेशियात संरक्षण, खनिज, बंदर विकासासह अनेक महत्त्वाचे करार

India Indonesia Agreements : भारत-इंडोनेशियात संरक्षण, खनिज, बंदर विकासासह अनेक महत्त्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याला मोठे यश

जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात भारत आणि इंडोनेशिया यांच्यात संरक्षण, पायाभूत सुविधा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण करारांवर सहमती झाली आहे. या करारांमुळे दोन्ही देशांतील व्यापक सामरिक भागीदारीला अधिक बळ मिळणार आहे.

भारत इंडोनेशियाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) तयार करण्यासाठी तांत्रिक सहकार्य करणार आहे. तसेच, भारताने विकसित केलेल्या ‘अस्त्र’ या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्यांनंतर इंडोनेशियाने भारताकडून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीला अधिक सक्षम करण्यासाठी भारत इंडोनेशियामध्ये स्टील, निकेल आणि रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटच्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, इंडोनेशिया आपल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र साठ्यात वाढ करत असून भारत त्यासाठी अतिरिक्त बॅटऱ्या उपलब्ध करून देणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि इंडोनेशिया संयुक्तपणे सबांग बंदराचा विकास करणार आहेत. मलक्का सामुद्रधुनीजवळ असलेले हे बंदर भारताच्या ग्रेट निकोबार बंदर प्रकल्पापासून सुमारे 100 मैल अंतरावर असून, हिंद-प्रशांत क्षेत्रातील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांची राष्ट्रपती भवन ‘इस्ताना मर्देका’ येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, संरक्षण सहकार्य, व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील अभ्यागत पुस्तकावर स्वाक्षरीही केली.

जकार्ता येथे आगमनानंतर पंतप्रधान मोदी यांचे भव्य औपचारिक स्वागत करण्यात आले. इंडोनेशियाच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला एस्कॉर्ट केले, तर राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी विमानतळावर स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. पारंपरिक सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाने या स्वागत सोहळ्याला विशेष रंगत आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा दौरा भारत-इंडोनेशिया व्यापक सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. या भेटीमुळे प्राधान्य क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील तसेच परस्पर विश्वास, सामायिक मूल्ये आणि दीर्घकालीन मैत्री अधिक मजबूत होईल.

विशेष म्हणजे, 2018 मध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्या संबंधांना व्यापक सामरिक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य, संयुक्त लष्करी सराव, संरक्षण उद्योगातील सहकार्य आणि ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >