Tuesday, July 7, 2026

Narendra Modi : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाकडून सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ पुरस्कार प्रदान

Narendra Modi : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाकडून सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ प्रदान करून गौरविले. हा सन्मान भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अधिक दृढ होत असलेल्या सामरिक व राजनैतिक संबंधांचे प्रतीक मानला जात आहे. यासह पंतप्रधान मोदी हे अशा जागतिक नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत, ज्यांना ३० हून अधिक देशांनी आपल्या सर्वोच्च किंवा प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मानांनी गौरविले आहे.

हा सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी तो केवळ त्यांचा नसून भारतातील कोट्यवधी नागरिकांचा सन्मान असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियाला भेट देत आहेत. जकार्ता येथील इस्ताना मर्देका राष्ट्रपती भवनात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी आयोजित औपचारिक समारंभात त्यांना ‘बिंतांग आदिपूर्णा’ हा सन्मान प्रदान केला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनाच्या अभ्यागत पुस्तकावर स्वाक्षरीही केली. स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर लिहिले की, “इस्ताना मर्देका येथे मिळालेल्या आत्मीय आणि उबदार स्वागतासाठी इंडोनेशियाचे मनःपूर्वक आभार.” भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला, महासागर दृष्टिकोनाला आणि मुक्त, सर्वसमावेशक व खुल्या हिंद-प्रशांत प्रदेशाविषयीच्या बांधिलकीला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

‘बिंतांग रिपब्लिक इंडोनेशिया आदिपूर्णा’ हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान असून त्याची स्थापना १९५९ मध्ये करण्यात आली होती. इंडोनेशियाची एकता, समृद्धी, सातत्य आणि राष्ट्रीय हितसंबंधांसाठी उल्लेखनीय व असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. हा सन्मान नागरी तसेच लष्करी क्षेत्रातील व्यक्तींनाही प्रदान केला जाऊ शकतो. परदेशी नेत्यांना मात्र दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या विशेष योगदानाच्या मान्यतेस्वरूप हा सन्मान बहाल केला जातो. त्यामुळेच तो इंडोनेशियातील सर्वात प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सन्मान मानला जातो. (Narendra Modi)

सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले की, हा गौरव केवळ त्यांचा नसून भारतातील कोट्यवधी जनतेचा आहे. त्यांनी म्हटले की, हा सन्मान भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक, सखोल आणि विश्वासपूर्ण संबंधांचा गौरव आहे. राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो, इंडोनेशिया सरकार आणि तेथील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच दोन्ही देशांमधील मैत्री आगामी काळात आणखी दृढ होईल आणि हा सन्मान दोन्ही देशांच्या जनतेतील विश्वास व सहकार्याचे प्रतीक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील व्यापक सामरिक भागीदारीला नवी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, सागरी सुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजे, पायाभूत सुविधा तसेच इतर सामरिक क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयानेही हा दौरा भारत-इंडोनेशिया व्यापक सामरिक भागीदारीला पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. हिंद-प्रशांत प्रदेशातील वाढत्या सामरिक महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सहकार्य प्रादेशिक स्थैर्य, सुरक्षितता आणि आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा