Tuesday, July 7, 2026

Ganesh Naik : मेळघाट वन्यजीव मृत्यू प्रकरण: दोषींवर कठोर कारवाई होणार; सॅटेलाईट आणि 'एआय'च्या माध्यमातून वनक्षेत्रावर नजर ठेवणार

Ganesh Naik : मेळघाट वन्यजीव मृत्यू प्रकरण: दोषींवर कठोर कारवाई होणार; सॅटेलाईट आणि 'एआय'च्या माध्यमातून वनक्षेत्रावर नजर ठेवणार

- वनमंत्री गणेश नाईक यांची विधान परिषदेत ग्वाही; वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनक्षेत्रातील वन्यजीवांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, वनक्षेत्रातील वन्यजीव आणि मानवी संघर्ष कायमचा कमी करण्यासाठी सरकार सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण वनक्षेत्रावर नजर ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे चौराकुंड वनक्षेत्रात जहाल विषप्रयोगामुळे ११ वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार सुनील शिंदे, भाई जगताप आणि बच्चू कडू यांनी सहभाग घेत प्राण्यांच्या मृत्यूच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्याची व रिक्त पदे भरण्याची मागणी केली. सदस्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, सुमारे १५,२७० हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या चौराकुंड परिक्षेत्रातील उत्तर अंजनझडप आणि उत्तर मालूर क्षेत्रात रानगवे, दोन गर्भवती भेकर, माकडे आणि खवले मांजर अशा वन्यजीवांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वन्यजीव क्राईम सेल, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनकर्मचारी आणि परतवाडा येथील 'डॉग स्कॉड'च्या मदतीने संपूर्ण परिसरात व्यापक 'कोंबिंग ऑपरेशन' राबवून तपास केला जात आहे. (Ganesh Naik)

वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि वनांचा विकास ही सरकारच्या प्राधान्याची बाब असल्याचे नमूद करत वनमंत्री नाईक (Ganesh Naik) यांनी सांगितले की, जंगलातील प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात आवश्यक शिकार आणि पिण्यासाठी कृत्रिम पाणवठे उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना वेगाने सुरू आहेत. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अभयारण्य आणि विदर्भात विशेष व्याघ्र प्रकल्प अधिक सक्षम केले जात आहेत. या अभयारण्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. या प्रकल्पांतर्गत बिबट सफारीसारखे विविध आकर्षक वन्यजीव सफारी उपक्रम सुरू केले जाणार असून, येत्या ४२ महिन्यांत ही सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन सरकारने केले असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सभागृहात दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >