Tuesday, July 7, 2026

Nitesh Rane : सावंतवाडीतील नळपाणी प्रकल्प आठ महिन्यांत पूर्ण करा!

Nitesh Rane : सावंतवाडीतील नळपाणी प्रकल्प आठ महिन्यांत पूर्ण करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; खोदकामांचा नागरिकांना त्रास होऊ देऊ नका

मुंबई : सावंतवाडी शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मात्र गेल्या काही काळापासून अपूर्ण स्थितीत राहिलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली असून, हे संपूर्ण काम पुढील ८ महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी येथे दिले. या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे शहरात सुरू असलेले खोदकाम, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून घडणारे अपघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे उर्वरित कामे करताना स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी व कंत्राटदारांनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी नळपाणी योजनेच्या सद्यस्थितीबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणी योजनेच्या कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा सूचना मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या. या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्यात यावी आणि हा संपूर्ण प्रकल्प निर्धारित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, याची जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मार्फत या कामावर प्रभावी देखरेख ठेवून तातडीने आवश्यक जल अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले; जेणेकरून उर्वरित काम विनाविलंब पूर्ण होऊन नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळेल.

कोकणातील पावसाळीस्थितीवर पालकमंत्र्यांचे बारीक लक्ष

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "नागरिकांची सुरक्षितता हेच राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री राणे यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >