Sunday, July 5, 2026

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामासाठी कासारवडवली (Kasarvadavali) परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांनी ६ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. बोगदा प्रकल्पांतर्गत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (MEIL) कंपनीकडून रस्त्याची पुनर्रचना आणि रॅम्प बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Ghodbunder Road)

या कालावधीत मुल्ला बाग येथील हिलक्रेस्ट सोसायटी ते नीलकंठ ग्रीन जोडणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गाऐवजी वाहनचालकांना नीलकंठ वूड्स आणि सत्यशंकर सोसायटीमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तेथून पुढे तात्पुरत्या मार्गाने वाहने पुन्हा मुल्ला बाग रस्त्यावर पोहोचतील.

वाहतूक निर्बंध ६ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून लागू होतील आणि ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कायम राहतील. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि ११६ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने, ग्रीन कॉरिडॉरमधील वाहने, ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, ११.८४ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे भविष्यात ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ ६० ते ९० मिनिटांवरून सुमारे १५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >