Sunday, June 28, 2026

Mumbai Rain : पावसामुळे अंधेरी सबवे बंद, शहरातील अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत

Mumbai Rain : पावसामुळे अंधेरी सबवे बंद, शहरातील अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक (Traffic) विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंधेरी, वांद्रे, खार, मालाड, गोरेगाव, जुहू आणि वर्सोवा परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अंधेरी सबवे (Andheri Subway) पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने हजारो वाहनचालकांचा खोळंबा झाला.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (Western Express Highway) वरही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने अंधेरी सबवेमध्ये वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री १:४५ वाजल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे बंद केली. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचल्याची दृश्ये समोर आली असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रविवारी सकाळी कार्यालये आणि इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि परिसरासाठी आजही यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा मान्सून मुंबईत तब्बल १३ दिवस उशिरा दाखल झाला असला, तरी आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >