Thursday, June 25, 2026

MP Sanjay Dina Patil : खासदार संजय दीना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ

MP Sanjay Dina Patil : खासदार संजय दीना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ

विधानसभेत पडसाद; दिलगिरी व्यक्त करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्ला

मुंबई : ईशान्य मुंबईचे शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जाहीरपणे धमकावल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी समोर आला. 'उबाठा' गटातून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार पाटलांच्या या अरेरावीचे पडसाद राज्य विधानसभेतही उमटले. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडत खासदारांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ek nath Shinde) यांनी तातडीने हस्तक्षेप करत, "लोकशाहीत पत्रकारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही; नकळत चूक झाली असल्यास संजय दीना पाटलांनी माध्यमांची जाहीर दिलगिरी व्यक्त करावी," असा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी 'उबाठा' गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय दीना पाटील यांनी, 'माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन, आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत', असा दावा केला होता. या चिथावणीखोर वक्तव्यावरून उबाठा गटाचे खासदार (UBT ) संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पाटलांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. याच कारवाईसंदर्भात आणि त्यांची मुलगी व उबाठा गटाची नगरसेविका (Nagrsevak) राजुल पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर खासदार पाटील यांचा पारा चढला. प्रसारमाध्यमांवर संतापत त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली. "तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा... परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला काय करायचंय ते करा," अशी खुली धमकी त्यांनी दिली. "मी जे बोललोय ते उघडपणे बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल ती पोलीस करतील, मी चौकशीला तयार आहे," असे सांगत त्यांनी आपल्या अरेरावीचे समर्थन केले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

शिंदे साहेबांनी मला शाबासकी दिली

माध्यमांशी बोलताना संजय दीना पाटील यांनी आपल्या कृतीचे समर्थन करत पक्षात अंतर्गत वाद नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "माझा शिवसैनिकांशी कोणताही वाद नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळेच मी खासदार झालो, त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. जे नेते आज माझ्या विरोधात बोलत आहेत, ते स्वतःची सरकारी सुरक्षा सोडून माझ्यासमोर येणार आहेत का? विरोधक स्वतःच्या 'दादा' लोकांकडून पोलिसांना फोन करून स्वतःच्या केसेस दाबतात, त्या केसेस आधी बाहेर काढा."संजय राऊतांवर (Sanjay Raut ) टीका करताना ते म्हणाले, "मी २००४ मध्ये शिवसेनेच्या लीलाधार डाके यांच्याविरोधात आणि नंतर किरीट सोमय्यांविरोधात लढलो, तेव्हा राऊतांनीच मला मदत केली होती. ती शिवसेनेसोबत गद्दारी नव्हती का? मी पाच लोक मारल्याचे जे बोललो, ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मी लोकांच्या मनावर राज्य करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिंदे साहेबांनी (एकनाथ शिंदे) माझ्या वक्तव्यावर कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही, उलट मला शाबासकी दिली आहे. मी मर्दांच्या पक्षात गेलो आहे आणि ते मर्दांची कदर करतात."

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

खासदार पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिंदे म्हणाले, "संजय दीना पाटील यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पत्रकारांबद्दल कोणतेही अपशब्द वापरण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात रोज सकाळी उठून 'मारून टाका', 'तोडून टाका', 'घरात घुसून मारा' अशी भाषा काही लोकांकडून सातत्याने वापरली जात आहे. या अर्वाच्य भाषेची मोठी व्यथा पाटलांच्या मनात होती आणि त्यातूनच हा राग व्यक्त झाला.""२०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्र ही खालची पातळी पाहत आहे. हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आणि आया-बहिणींचा आदर करणारा महाराष्ट्र आहे. इथे अशी भाषा कोणालाही शोभत नाही. खासदार पाटलांनी मला खात्री दिली आहे की, त्यांच्याकडून नकळत काही चुकीचे शब्द गेले असल्यास ते माध्यमांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतील." दरम्यान, पत्रकारांच्या विविध संघटनांनी राज्यभरातून या घटनेचा निषेध केला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान राखला जावा, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >