Thursday, June 25, 2026

Sanjay Dina Patil : पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा" – संजय दिना पाटील यांना शिंदेंचा सल्ला

Sanjay Dina Patil : पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा

रोज अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ करणाऱ्यांवर शिंदे यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : पत्रकारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट भूमिका घेत, पत्रकारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे सांगितले. खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्याशी चर्चा करून त्यांना माध्यमांची दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

यावेळी रोज सकाळी उठून अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ करणाऱ्यांबद्दलही शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 'मारून टाका', 'तोडून टाका', 'घरात घुसून मारा' अशा प्रकारची भाषा सातत्याने माध्यमांसमोर वापरली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, याबाबत बोलताना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि माध्यमांचाही अवमान करणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले, "संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची मी माहिती घेतली आहे. त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, पत्रकारांबद्दल कोणतेही अपशब्द वापरण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पत्रकारांशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, असे त्यांनी मला सांगितले." मात्र, सातत्याने काहीजण माध्यमांसमोर अत्यंत अर्वाच्य आणि खालच्या दर्जाची भाषा वापरत असल्याबद्दल संजय दिना पाटील यांनी माझ्याकडे व्यथा बोलून दाखवली. त्याचा राग त्यांच्या मनात आहे. पत्रकारांबद्दल मला काहीही वाईट बोलायचे नव्हते, असे त्यांनी मला सांगितल्याचे शिंदे म्हणाले.

"रोज सकाळी 'मारून टाका', 'तोडून टाका', 'घरात घुसून मारा' अशा प्रकारची भाषा काही लोक माध्यमांसमोर वापरत आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य केवळ राजकीय संस्कृतीलाच नाही, तर माध्यमांचाही अपमान करणारे आहे," असे शिंदे म्हणाले.

संजय दिना पाटील यांच्या मनात पत्रकारांविषयी कोणताही राग किंवा द्वेष नसल्याचे सांगत, अशा प्रकारची वक्तव्ये भविष्यात टाळण्याचा सल्लाही आपण दिल्याचे शिंदे म्हणाले. "आपल्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील, तर माध्यमांची दिलगिरी व्यक्त करा, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले," असे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिंदे यांनी संजय दिना पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. "रोज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप केले जात आहेत.घरच्यांबद्दलही अपमानास्पद भाषा वापरली जाते. हे अत्यंत निंदनीय आहे, अशी भावना त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केली," असे शिंदे म्हणाले.

"२०२२ पासून अशा प्रकारची भाषा आणि वक्तव्ये महाराष्ट्र पाहत आहे. हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा महाराष्ट्र आहे. आया-बहिणींचा उद्धार करणारी, खालच्या पातळीची भाषा वापरणे कोणालाही शोभणारे नाही," असेही शिंदे यांनी ठणकावले.

शेवटी शिंदे म्हणाले, "संजय दिना पाटील यांनी मला सांगितले आहे की, माझ्याकडून नकळत काही अपशब्द गेले असतील, तर मी माध्यमांची मनापासून दिलगिरी व्यक्त करेन." पत्रकारांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, या संपूर्ण प्रकरणात पत्रकारांचा सन्मान राखण्याची भूमिका घेत शिंदे यांनी संबंधितांना संयमित भाषा वापरण्याचे आवाहन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा