Tuesday, June 23, 2026

Union Education Minister Dharmendra Pradhan : पेपर माफियांवर कारवाई करणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Union Education Minister Dharmendra Pradhan : पेपर माफियांवर कारवाई करणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : पेपर लीक प्रकरणात सहभागी घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. तसेच पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणकाधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

पेपर लीकच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकार परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी कटिबद्ध आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, जेणेकरून तथाकथित ‘पेपर माफिया’चे जाळे पूर्णपणे नष्ट करता येईल. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता ही केवळ सरकारची नव्हे, तर समाज, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार नीट(NEET) परीक्षा संगणकाधारित करण्याचा गंभीरपणे विचार सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या संभाव्य बदलाच्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय परीक्षा प्रक्रिया अधिक विकेंद्रित आणि पारदर्शक करण्याच्या पर्यायांवरही चर्चा सुरू असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

नीट पेपर फुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनांबाबत प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र काही संघटनांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. देशविरोधी विचारसरणीशी संबंधित लोक आज आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आंदोलनस्थळी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना प्रधान म्हणाले की, राहुल गांधी विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. प्रश्न विचारणे हा लोकशाहीतील अधिकार असला तरी विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता आणि भीती निर्माण करणे योग्य नाही, असे प्रधान यांनी सांगितले.

नागपूरमधील एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र म्हणून अबू धाबी देण्यात आल्याच्या वादावर बोलताना शिक्षण मंत्र्यांनी दावा केला की, संबंधित विद्यार्थ्याने स्वतः पोर्टलवर अबू धाबी केंद्राची निवड केली होती. यासंदर्भातील सर्व नोंदी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नंतर एनटीए ने विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी संपर्क साधून नागपूरमध्ये परीक्षा देण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचे राजकीयकरण करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी यांनी तथ्यांच्या आधारेच वक्तव्य करावे असा टोला देखील त्यांनी लगावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा