Saturday, June 20, 2026

Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. तसेच धरण क्षेत्र व अन्य उद्भव क्षेत्रांमधून होणारा अनधिकृत पाणीउपसा तात्काळ थांबविण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.

जिल्ह्यात १५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात सध्या १५१ टँकरद्वारे १६१ गावे आणि ८६७ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार मजूर घरकुलांच्या कामांवर कार्यरत असून, मागणीनुसार अधिक कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जनावरांसाठी सध्या पुरेसा चारा उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष उपलब्धतेचा नव्याने सर्वेक्षण अहवाल पाच ते सहा दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील चारा बाहेर जाणार नाही याची दक्षता पशुसंवर्धन विभागाने घ्यावी तसेच कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी (Agriculture and Animal Husbandry Department) संयुक्तपणे तालुकानिहाय व गावनिहाय आढावा घेऊन नियोजन करावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.

टँकरसाठी ज्या ठिकाणी पाणी भरले जाते तेथील वीजपुरवठा अखंडित ठेवण्याची जबाबदारी महावितरणने पार पाडावी. तसेच टँकरचे पाणी विहिरीत न टाकता तोटीयुक्त प्लास्टिकच्या टाक्यांमधून नागरिकांना वितरित करावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टळेल आणि सर्वांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

टँकरच्या पाण्याचे नमुने नियमित तपासावेत, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री करावी, पाणीपुरवठा स्रोतांची सातत्याने तपासणी करावी आणि टँकरच्या पाणीवाटपासाठी निश्चित वेळापत्रक तयार करून त्यानुसारच वितरण करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >