Monday, June 15, 2026

fertilizers stock : खरीप २०२६ हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा

fertilizers stock : खरीप २०२६ हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांच्या शांतता करारानंतर निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही खरीप हंगाम २०२६ साठी देशात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रसायन व खत मंत्रालयाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खत विभागाच्या संयुक्त सचिव वंदना प्रयाशी यांनी सांगितले की, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&FW) खरीप २०२६ साठी खतांची एकूण मागणी ३८३.९ लाख मेट्रिक टन इतकी निश्चित केली आहे. सध्या देशात १९६.६५ लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असून तो एकूण गरजेच्या सुमारे ५१ टक्के आहे. सामान्यतः हा साठा सुमारे ३३ टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे यंदाची स्थिती अधिक समाधानकारक असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.
सरकारच्या प्रभावी नियोजन, आगाऊ साठवणूक आणि सुधारित वाहतूक व्यवस्थेमुळे खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यात यश आले असल्याचेही सांगण्यात आले. चालू खरीप हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांनी १०२.७८ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची खरेदी केली आहे, जी एकूण गरजेच्या सुमारे २७ टक्के आहे. तसेच देशात सेंद्रिय खतांचा वापरही वाढताना दिसत आहे. सध्या २२.६७ लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांचा साठा उपलब्ध असून त्यापैकी ११.८२ लाख मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री केवळ ३.३१ लाख मेट्रिक टन होती. वंदना प्रयाशी यांनी सांगितले की, सेंद्रिय खतांच्या वापरात झालेली ही वाढ शेतकऱ्यांचा शाश्वत शेतीकडे वाढता कल दर्शवते. रासायनिक खतांसोबत सेंद्रिय पर्याय स्वीकारण्याची प्रवृत्ती सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, अलीकडील जागतिक परिस्थितीनंतरही देशात १२३.६५ लाख मेट्रिक टन देशांतर्गत उत्पादन आणि ३९.३६ लाख मेट्रिक टन आयात झाली असून एकूण १६३.०१ लाख मेट्रिक टन खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, पुरेसा साठा, वेळेवर आयात आणि देशांतर्गत उत्पादनातील वाढ यामुळे खरीप हंगामात खतांच्या टंचाईचा धोका निर्माण होणार नाही. कृषी तज्ज्ञांच्या मते, वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता ही उत्पादनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्याची स्थिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताने खतांचा मजबूत साठा राखल्यामुळे खरीप हंगामातील कृषी उत्पादन स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा