Sunday, June 14, 2026

BKC : सकाळची वाहतूक सुरळीत; पण सायंकाळी पुन्हा कोंडीचेच चित्र

BKC : सकाळची वाहतूक सुरळीत; पण सायंकाळी पुन्हा कोंडीचेच चित्र

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) वाहतूककोंडीवर उपाय म्हणून दर शुक्रवारी 'सार्वजनिक वाहतूक दिन' पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, या उपक्रमाला पहिल्याच शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सकाळच्या वेळी वाहतूक सुरळीत राहिली असली तरी, सायंकाळच्या वेळी मात्र नेहमीप्रमाणे वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि कोंडीचे चित्र पाहायला मिळाले.

काय होते नियोजन?

एमएमआरडीए, बेस्ट आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे या उपक्रमासाठी मोठी तयारी केली होती.

  • एमएमआरडीएचा पुढाकार: प्राधिकरणाने आपल्या कार्यालयाची पार्किंगची प्रवेशद्वारे पूर्णपणे बंद ठेवली होती. कर्मचाऱ्यांसह भेटीसाठी येणाऱ्यांनाही खासगी वाहने आत आणण्यास मनाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार हे पायी चालत कार्यालयात आले, तर अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी मेट्रोने प्रवास केला.

  • बेस्टची जादा सेवा: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने वांद्रे स्थानक ते बीकेसी मार्गावर दर पाच मिनिटांनी बसेस सोडल्या. नेहमीच्या १९ बसेस व्यतिरिक्त ७ जादा बसेस सोडून एकूण २६ बसेसद्वारे सेवा देण्यात आली.

  • पोलीस बंदोबस्त: वाहतूक पोलिसांनी वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर विशेष नियुक्ती केली होती, ज्यामुळे सकाळी रिक्षा चालकांची बेशिस्त कमी होऊन वाहतूक सुरळीत राहिली.

सायंकाळची परिस्थिती जैसे थे

दिवसभरात बीकेसीमध्ये येणाऱ्या खासगी वाहनांच्या संख्येत १० ते १५ टक्क्यांनी घट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. तरीही, सायंकाळच्या सत्रात बीकेसीतून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर मोठी कोंडी झाली होती. एनएसईपासून कुटुंब न्यायालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.

अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीऐवजी स्वतःच्या खासगी वाहनांनीच येणे पसंत केले. यामुळे एमएमआरडीएच्या आवाहनाला पहिल्या दिवशी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. बीकेसीतील वाहतूक समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार का, हे पुढील काही शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >