Thursday, June 11, 2026

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये रंगली असली, तरी ही माहिती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण देत भारतीय आंब्याची नेपाळमध्ये आयात आणि निर्यात सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सरकारच्या वनस्पती अलगीकरण व कीटकनाशके व्यवस्थापन केंद्राने (राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना) 10 जून 2026 रोजी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, भारतीय आंब्याच्या आयातीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. वनस्पती आरोग्याशी संबंधित अटींची पूर्तता करणाऱ्या खेपांना नियमितपणे आयात परवानगी दिली जात आहे. (Indian Mango)

भारतीय आंब्याची निर्यात सुरूच :

भारतीय आंब्याच्या निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे आकडेवारीवरूनही स्पष्ट होते. जानेवारी 2026 पासून आतापर्यंत भारतातून 149 खेपांद्वारे तब्बल 2,005 मेट्रिक टन आंबा नेपाळला निर्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ जून 2026 महिन्यातच 18 खेपांमधून 266 मेट्रिक टन आंबा नेपाळमध्ये पाठवण्यात आला आहे. यावरून भारतीय आंब्याची मागणी कायम असून दोन्ही देशांमधील व्यापार सुरळीत सुरू असल्याचे दिसून येते. (Indian Mango)

नेपाळने बदलल्या आयात अटी :

नेपाळने अलीकडेच फळांच्या आयातीसाठी काही नवीन तांत्रिक अटी लागू केल्या आहेत. यामध्ये आंब्यांवर नियंत्रित तापमानात गरम पाण्याची प्रक्रिया (हॉट वॉटर ट्रीटमेंट) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेचा उद्देश कीड आणि रोगांचा प्रसार रोखणे हा आहे. भारताने या नवीन अटींचे पालन करून निर्यात सुरू ठेवली आहे. मात्र, अशा अटी लागू करण्यापूर्वी योग्य सल्लामसलत न झाल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. (Indian Mango)

द्विपक्षीय स्तरावर पाठपुरावा :

भारत सरकारने या विषयावर जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) आरोग्य व वनस्पती आरोग्य करार (SPS Agreement) तसेच आंतरराष्ट्रीय वनस्पती संरक्षण करार (IPPC) यांच्या चौकटीत नेपाळशी चर्चा सुरू ठेवली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार सुरळीत राहावा यासाठी योग्य राजनैतिक आणि तांत्रिक स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. (Indian Mango)

अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन :

कृषी मंत्रालयाने व्यापारी, निर्यातदार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, आयात-निर्यातीसंदर्भातील माहिती केवळ अधिकृत स्रोतांकडूनच घ्यावी. भारतीय आंब्यावर नेपाळने बंदी घातल्याच्या अनधिकृत आणि अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे भारतीय आंबा उत्पादक आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला असून नेपाळ बाजारपेठेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. (Indian Mango)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >