Tuesday, June 9, 2026

Transport Minister Pratap Sarnaik : घोडबंदरची शिवसृष्टी आता एमटीडीसीमार्फत विकसित होणार!

Transport Minister Pratap Sarnaik :  घोडबंदरची शिवसृष्टी आता एमटीडीसीमार्फत विकसित होणार!

मुंबई: गेली अनेक वर्षे रखडलेल्या घोडबंदर येथील ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.या संदर्भात मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन सचिव संजय खंदारे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त राधा बिनोद शर्मा तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून घोडबंदर किल्ला व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. घोडबंदर किल्ला, खाडी किनारा , त्या बाजूला स्काय वॉक अशा विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. घोडबंदर किल्ला परिसराचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने घोडबंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ‘शिवसृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत सुमारे ५० कोटी रुपये खर्चाच्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पास मंजुरी दिली होती.

या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ७५ टक्के निधी पर्यटन विभागामार्फत आणि उर्वरित २५ टक्के निधी संबंधित

महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला होता. मात्र, निर्णयप्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता राहावी तसेच प्रकल्पाचे काम अधिक वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी संपूर्ण खर्च पर्यटन विभागानेच करावा, अशी विनंती मी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली होती.त्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत मंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. त्यानुसार घोडबंदर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचा संपूर्ण खर्च पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) करण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळणार असून तो लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यावेळी उपस्थित अधिकारी तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रकल्पाला दिलेल्या सहकार्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >