Thursday, June 4, 2026

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC च्या ८०० हून अधिक बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा २४ तास पहारा

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC च्या ८०० हून अधिक बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा २४ तास पहारा

नवी दिल्ली (IRCTC AI Cameras) : रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी गाड्यांमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. देशभरातील IRCTC च्या बेस किचनवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास नजर ठेवली जात आहे.

८०० हून अधिक किचनमध्ये (Kitchen) २,३९४ AI कॅमेरे

IRCTC ने देशभरातील ८०० पेक्षा अधिक बेस किचनमध्ये तब्बल २,३९४ AI-सक्षम कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे केवळ देखरेख करत नाहीत, तर अन्न तयार करताना होणाऱ्या ९ प्रकारच्या नियमभंग आणि स्वच्छतेतील त्रुटी स्वयंचलितपणे ओळखतात.

कोणत्या बाबींवर ठेवली जाते नजर?

- कर्मचाऱ्यांनी हेअरनेट (Hair Net) किंवा पारदर्शक ग्लव्स (Gloves) न वापरणे - किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव असणे - अन्न उघड्यावर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवणे - उंदीर, माश्या किंवा झुरळांचा वावर - अन्न हाताळताना स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन

विशेष म्हणजे, अवघ्या ७ ते ८ मिलिमीटर आकाराचा कीटकही हे AI कॅमेरे शोधू शकतात.

नियमभंग झाल्यास २ तासांत कारवाई

किचनमध्ये कोणतीही त्रुटी किंवा अस्वच्छता आढळल्यास AI प्रणाली संबंधित किचन व्यवस्थापकाला तत्काळ अलर्ट पाठवते. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले जाते. साधारणपणे नियमभंग आढळल्यानंतर २ तासांच्या आत संबंधित व्यक्ती किंवा कंत्राटदारावर कारवाई केली जाते. सध्या या यंत्रणेमुळे दररोज सरासरी ३५० अलर्ट निर्माण होत आहेत. गेल्या एका महिन्यात एकूण १३,५५० अलर्ट नोंदवले गेले. यामध्ये उत्तर विभागातून सर्वाधिक ४,१२३ तर दक्षिण विभागातून सर्वात कमी १,२०९ अलर्ट प्राप्त झाले.

१० टक्के अलर्ट तांत्रिकदृष्ट्या चुकीचे

AI प्रणाली अत्यंत संवेदनशील असल्याने काही वेळा अंदाजे १० टक्के अलर्ट चुकीचेही ठरतात. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याने हेअरनेट घातले असले तरी ते व्यवस्थित न दिसल्यास AI त्याला नियमभंग मानून अलर्ट जारी करू शकते.

दरवर्षी ६० कोटी प्रवाशांना सेवा

सध्या १,४५३ रेल्वे गाड्यांमध्ये IRCTC कडून खानपान सेवा पुरवली जाते. दरवर्षी सुमारे ६० कोटी प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. मागील ५ वर्षांत अन्नाच्या गुणवत्तेसंदर्भात १९,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, अन्नाच्या गुणवत्तेबाबत रेल्वे मंत्रालयानेही कठोर भूमिका घेतली आहे. नुकतेच पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे दही पुरवल्याप्रकरणी IRCTC वर १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच संबंधित अन्नपुरवठादार कंपनीवरही ५० लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी IRCTC कडून AI तंत्रज्ञानाचा वापर हा एक महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय मानला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >