Wednesday, June 3, 2026

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी
 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 'स्वग्राम' (Swagram) बदलण्यासंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक कारणे, स्थलांतर किंवा इतर वैयक्तिक अडचणींमुळे स्वग्राम बदलण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते. एकदा स्वग्राम निश्चित केल्यानंतर सेवाकाळात केवळ एकदाच त्यामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जात होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बदललेल्या परिस्थितीनुसार स्वग्राम बदलता येत नव्हता. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना या नियमाचा अधिक फटका बसत होता. विवाहानंतर राहण्याचे ठिकाण बदलूनही अनेकांना अधिकृत नोंदींमध्ये बदल करता येत नव्हता. परिणामी काही शासकीय सुविधा आणि सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
नवीन निर्णयानुसार, विवाह, घटस्फोट, वैधव्य, पुनर्विवाह किंवा परित्यक्ता अशा विशेष परिस्थितींमध्ये महिला कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्वग्राम घोषित करून एकदा बदल केला आहे, त्यांनाही आणखी एकदा बदल करण्याची संधी मिळणार आहे. सुधारित नियमांनुसार, नियुक्तीनंतर ६ महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे आवश्यक राहणार आहे. मात्र त्यानंतर बदलासाठी अधिकृत अर्ज करावा लागेल. संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतरच बदलाची नोंद सेवापुस्तकात करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरत असून सेवासुविधांचा लाभ घेणे आता अधिक सोपे होणार आहे.
 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >