Wednesday, June 3, 2026

Borivali Bribery Case: दंड कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली; आरटीओ कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं

Borivali Bribery Case: दंड कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली; आरटीओ कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं
मुंबईतील बोरिवली (Boriwali) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक (Arrest) केली आहे. दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यावर आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या खासगी बसवर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी २६,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तक्रारदाराने बोरिवली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधला होता. कनिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे असं लाच घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे. यावेळी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दंड कमी करून देण्यासाठी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली. चौकशीत संबंधित कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपीने ५ हजार रुपयांपैकी ४ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सरकारी कामासाठी कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >