Tuesday, June 2, 2026

BMC News : येत्या १० जूनपासून नोंदणीकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र

BMC News : येत्या १० जूनपासून नोंदणीकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र

- उपमहापौर संजय घाडी, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांसंदर्भात आयुक्तांची भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

येत्या १० जून २०२६ पासून प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये ९९,४३५ नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू. आर.कोड असलेले ओळखपत्र देण्यात येईल. तसेच लवकरात लवकर टाऊन वेंडिंग समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार टाऊन वेंडिंग समितीचे काम सुरू होईल असे प्रशासनाच्यावतीने आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेनेचे नेते संजय घाडी यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (BMC News)

मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत उपमहापौर संजय घाडी, शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपमसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी, विधी समितीच्या अध्यक्षा दिक्षा कारकर व मुंबई शहरातील अधिकृत फेरीवाल्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. (BMC News)

आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये मुंबई शहरांमध्ये ९९,४३५ एवढे नोंदणीकृत फेरीवाले असून त्यांना क्यू.आर.कोड असलेले ओळखपत्र मुंबई महानगरपालिकेने त्वरित द्यावेत अशी मागणी केली.तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या २० ठिकाणी फेरीवाले बसवायचे नाहीत, ती २० ठिकाणे सोडून अन्य ठिकाणी फेरीवाल्यांची फेरीवाला विभाग घोषित करून, तेथे त्यांना व्यवसाय करायला द्यावा अशी मागणी करण्यात आली. (BMC News)

तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार टाऊन वेंडिंग समिती गठित करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. याबाबत १० जून २०२६ पासून प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये ९९४३५ नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू. आर.कोड असलेले ओळखपत्र देण्यात येईल असे आयुक्तांनी घोषित केले. तसेच लवकरात लवकर टाऊन वेंडिंग समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार टाऊन वेंडिंग समितीचे काम सुरू होईल, असेही प्रशासनाने सांगितले,असेही घाडी आणि निरुपम यांनी सांगितले. (BMC News)

बांग्लादेशींवर कारवाई व्हायला हवी, पण...

मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असली तरी राजकीय नेत्यांच्या केवळ तक्रारीवरून कोणतीही कारवाई करू नये, पण जी कायदेशीर कारवाई करता येईल तेवढीच करावी अशाप्रकारे सांगत माजी खासदार संजय निरुपम यांनी सध्या सुरु असलेल्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बांग्लादेशी मुस्लिमांवर कारवाई व्हायलाच हवी. पण ही कारवाई करताना आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये किती बांग्लादेशी आढळून आले याचीही माहिती दिली जावी. परंतु बांग्लादेशींच्या नावाखाली मराठी आणि उत्तर भारतीयांसह भारतीय नागरिक असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई होते, हे योग्य नसल्याचीही रि निरुपम यांनी ओढली. (BMC News)

Comments
Add Comment